वर्धा – करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सातत्याने आवाहन केले जात आहे. मात्र, वर्धामध्ये भाजपच्या आमदारानेच याला हरताळ फासत वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना सहकार्य करत गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, भाजपचे आर्वी येथील आमदार दादाराव केचे यांनी संचारबंदी आणि जमावबंदीचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा केल्याने सर्वच स्तरातून यावर टीका होत आहे.
आमदार दादाराव केचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्रित केले. यासाठी रिक्षा फिरवून धान्य वाटपाचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर धान्य वाटपच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे भंग करण्यात आला. केचे यांच्या घरासमोर जमलेली गर्दी एखाद्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जमवलेल्या लोकांप्रमाणे भासत होती.
एकिकडे प्रशासन सूचना, विनंती, आदेश आणि अक्षरशः केविलवाणी विनवणी करून नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात घरात रोखून धरत आहे. मात्र, भाजप आमदारांच्या या कृत्याने चक्क साथ रोग नियंत्रण कायद्यालाच हरताळ फासला गेला आहे. आता यावर प्रशासन काय पाऊल उचलते ते पाहणे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे.