- ई पॉस मशिनवरची बायोमेट्रीक पडताळणी बंद
- आंगठा न लावता मिळणार धान्य
- अपहार होऊ नये म्हणून प्रशासनाची रहाणार नजर
पिंपरी – संपूर्ण देशभरात करोनामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. खासगी कंपन्या, सरकारी कार्यालये आणि दुकानेही मागील दोन दिवसांपासून बंद असताना शहरतील रेशन दुकानावरही याचा परिणाम झालेला पहायला मिळाला आहे. रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनाने दुकानदारांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच धान्य देतेवेळी लाभार्थ्यांना आता ई-पॉस उपकरणावर होणारी बायोमेट्रीक पडताळणीही काही कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आता अंगठा न लावता धान्य मिळणार आहे.
राज्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने तातडीच्या अपत्कालीन योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून वाटप करण्यात येणाऱ्या धान्यवेळी लाभार्थ्यांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय शासनाने केले आहेत. त्यानुसार रेशन दुकानातून शिधावस्तूचे वितरण करताना लाभार्थ्याची बायोमेट्रीक पडताळणी न करता रेशन दुकानदारांनी स्वत:चे अधार आधिप्रमाणीत करून धान्यवाटप करावे तशा सुविधाही ई-पॉस उपकरणावर निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, आता लाभार्थ्यांना पुढील काही दिवस ई-पॉस उपकरणावर अंगठा न लावता धान्य मिळणार आहे. तसेच धान्यवाटप न करताना रेशन दुकानावर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी लाभार्थ्यांना टोकन देऊन ठराविक वेळेत एक-एका लाभार्थ्यांना बोलावून धान्यवाटप करावे, अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
याबरोबरच रेशन धान्याची साठवणूक करणाऱ्या कल्याणकारी संस्थाना गोदामातून देण्यात येणारे धान्य वितरीत करताना काळजीही घेण्यात येणार आहे. त्यासाठी धान्याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीची तपासणीही करण्यात येणार आहे. अशा प्रकारे रेशन दुकानात वितरीत होणाऱ्या धान्यामुळे करोनाची लागण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. या सर्व गोष्टीची अंमलबजावणी 31 मार्चपर्यंत करण्याचे आदेश दिलेले आहे.
लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्न
करोनाच्या भीतीमुळे रेशन दुकानातून धान्य मिळण्यापासून नागरिक वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच नागरिकांना धान्य घेण्यासाठी आता बायोमेट्रीकवर आपला अंगठा लावण्याची गरज नाही. मात्र, असे करत असताना रेशन दुकानदाराकडून काळा बाजार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून दुकानदारावर नजर ठेवण्यात येणार आहे.