मुंबई :कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसह सरकार बनवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेसशी चर्चेचा सीलसीला सुरूच ठेवला आहे. काल रात्री त्यांनी केंद्रातील कॉंग्रेसचे वजनदार नेते अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आज अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माणिकराव ठाकरे या राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. ही चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचे ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सरकार बनवण्याचा हा शिवसेनेचा पहिलाच प्रयत्न आहे. शिवसेनेच्या सरकारला पाठींबा दिल्यास आपली पारंपरिक मतपेढी घालवून बसू, अशी भीती कॉंग्रेसमधील एका गटाला वाटत होती. त्यामुळे शिवसेनेशी आघाडी करताना कॉंग्रेस जपून पावले टाकत असल्याचे चित्र आहे. विचारसरणीतील फरक ही कॉंग्रेससमोरील प्रमुख अडचण आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम घेऊन त्या आधारे कॉंग्रेसला पुढे जावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसांत ठाकरे आणि पटेल यांच्यात दूरध्वनीवर चर्चा झाली असली तरी हे दोन्ही नेते प्रथमच काल भेटले. कॉंगेस अध्यक्षांचे निकटवर्तीय अशी ओळख असणाऱ्या पटेल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही शिवसेनेला सरकार स्थापनेला पाठींबा देण्याबाबत चर्चा केली. किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील वाट्याचे प्रमाण याबाबत या पाऊण तासाच्या चर्चेत बऱ्यापैकी एकमत झाले, असे शिवसेनेतील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी प्रमाणेच शिवसेनेलाही किमान समान कार्यक्रमाबाबत स्पष्टता हवी आहे. त्याला लवकरच अंतिम रुप दिले जाईल, असे उध्दव ठाकरे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, राजकारण नव्या दिशेने जात आहे. त्याची सुरवात झाली आहे. लोकांना काही काळ वाट पहायला लागेल.
राज्यातील राजकीय अस्थैर्याबाबत भगवान शंकराचे उदाहरण देत सामनाने भाजपावर शरसंधान केले आहे. राज्यातील अस्थैर्याचे हलाहल शिवसेनेने पचवले आहे. त्यातून स्थीर सरकारचे अमृत जनतेला आम्ही देवू. आम्ही कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्याने भाजपाला पोटशुळ उठला आहे. तो बिहार आणि जम्मू काश्मिरमध्ये विरोधी मतप्रवाहांबरोबर जाताना कोठे होता, असा सवाल सामनाच्या अग्रलेखात केला आहे.