बाजारभाव नसल्याने भाज्या उकिरड्यावर
बेल्हे – फ्लॉवर, कोबी या ज्यांना बाजारात भाव नसल्याने बेल्हे (ता. जुन्नर) येथील परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातून पीक काढण्याऐवजी ते मेंढ्यांना खाण्यासाठी दिले आहे.
सध्या सर्वत्र उकाडा जाणवत असून मध्यंतरी ढगाळ वातावरण असताना पाऊस नाही तर बाजारात शेतकऱ्याच्या भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी फ्लॉवर उकिरड्यावर फेकत आहे, तर काही शेतकऱ्यांवर फ्लॉवरच्या उभ्या पिकांमध्ये मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांनी जेमतेम पाण्यावर घेतलेल्या फ्लॉवर, कोबी, मिरची यांसारख्या प्रमुख भाजीपाला शेतमालाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती संपूर्ण खालावली असल्याचे बाळासाहेब अभंग यांनी सांगितले.
हातात येणारे पीक वाया गेले आहे. आर्थिक गणित चुकल्या मागे पडले याला बाजारभाव हेच प्रमुख कारण आहे, असे म्हणण्याची वेळ सध्या बळीराजावर आली आहे. शेतमाल चांगल्या प्रकारे पिकवितो आणि विकण्याची वेळ येते तेव्हा कवडीमोल बाजारभाव मिळतो. महागडे बियाणे, खते,रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च सुटणे कठीण झाले आहे. शेतीत कमविले यापेक्षा किती गमविले याचे गणित जुळत नाही. कोबी, फ्लॉवर बाजारात विकण्यासाठी गेले असता भाडेही वसूल होत नाही. गाडी भाडे, मजुरी घरातून द्यावी लागत आहे. पिके कोणती घ्यावी, या संकटात येथील परिसरातील शेतकरी वर्ग सापडला आहे.