सातारा -खटाव, माणसह सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी अतिरिक्त पाण्याची तरतूद करण्यासाठी फेर जलनियोजनाचा निर्णय घेणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आ. जयकुमार गोरे यांनी आभार मानले. मुंबई येथे श्री. फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी दुष्काळी जनतेच्या वतीने धन्यवाद दिले.
अवर्षण प्रवण खटाव, माण, कोरेगाव आणि सातारा तालुक्यात शेती सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करणे गरजेचे होते. कृष्णा प्रकल्पाच्या पाणी वापरात होणाऱ्या बदलांमुळे पुनर्विलोकन करुन या प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन करण्याची मागणी केली जात होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहिवडी येथील सभेत पाणी वापराचे फेरनियोजन करण्याचे संकेत दिले होते.
तीन दिवसांपुर्वी महायुतीच्या सरकारने क्रांतीकारी निर्णय घेत कृष्णा प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन करुन जिल्ह्यातील दुष्काळी भागाला टेंभू योजनेचे दोन व इतर उपसा सिंचन योजनांसाठी दोन असे चार टीएमसी पाणी उपलब्ध करुन दिले आहे. उपलब्ध झालेल्या अतिरिक्त पाण्यामुळे माण, खटावसह चार तालुक्यांमधील शेकडो गावे नव्याने पाणी योजनांच्या लाभक्षेत्रात येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाच्या व्यथा जाणून फेर जलनियोजन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आ. गोरे यांनी त्यांचे आभार मानले.