सोरतापवाडी, (वार्ताहर) – गतहंगामात म्हणजेच 2023 सालात झालेल्या कमी पावसाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. 2024चा उन्हाळा खूपच कडक असून पारावर चढत असून शेतकर्यांना अनेक संकटातून जावे लागत आहे. पूर्व हवेलीतील अनेक गावात उन्हामुळे भाजीपाला, फुले व इतर पिके कोमेजून गेली आहेत. यात शेतकर्यांची स्वप्ने देखील करपू लागली आहेत.
शेतकर्यांना शेती करताना उन्हामुळे अधिकच त्रास होऊ लागल्याने भाजीपाल्याची व इतर पिकाची पेरणी केली असता उन्हाळ्यामुळे उगवण क्षमता कमी होत आहे. उगवण झाल्यानंतर उन्हाच्या तीव्रतेने भाजीपाला व इतर पिके कोमेजून जाऊन जळून चालली आहेत.
उन्हामुळे व कमी बाजारभावामुळे शेतकर्यांची स्वप्ने करपली जात आहेत. सोरतापवाडी परिसरातील फुल शेती उन्हामुळे कमी झाली असुन ती बंद होण्याच्या मार्गावर आहे. नर्सरी मध्ये रोपांना सतत पाणी दयावे लागत आहेत. उन्हाच्या तिव्रतेने झाडे जळून जाऊ लागली आहेत व फुले कोमेजून जात आहेत. त्यामुळे शेतकर्यांना शेती करणे अवघड होत चालले आहे.
महावितरणच्या सतत वीज गायबचा अजब कारभाराचा फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यातच विजेच्या सततच्या लपंडावाने शेतकरी मेटाकुटीला आला असून, उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी दुसर्या किंवा तिसर्या दिवशी द्यावे लागत आहे. पाणी दिले तरी पिके कोमेजलेली दिसत आहेत.
त्यामुळे पिके कशी जगवायची, याच्या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत. भाजीपाला काढणीला येईपर्यंत शेतकर्यांच्या हातात फक्त 25 टक्के शेतमाल शिल्लक राहत असून त्या पटीत बाजारभाव मिळत नाही.- भाऊसाहेब चौधरी, प्रगतशील शेतकरी सोरतापवाडी