पुणे – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेत असताना सुरक्षित अंतर राखत आणि विद्यार्थ्याची योग्य काळजी घेत परीक्षा घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत.
करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवतानाच परीक्षा केंद्रांच्या निर्जंतुकीकरणाबाबत सरकारने मार्गदर्शन केले आहे. तसेच, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर असावे. मास्कचा वापर अनिवार्य आहे. सॅनिटायझर अथवा साबणाचा वापर वारंवार करावा. शिंकताना अथवा खोकताना नाका-तोंडावर रूमाल असणे आवश्यक आहे. थुंकण्यास सक्त मनाई आहे. सर्वांना आरोग्य सेतू ऍप बंधनकारक आहे.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परीक्षा केंद्रानाच मुभा देण्यात यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रवेश नाही. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा इतर मार्गांनी घ्यावी. परीक्षा केंद्रावर गर्दी काळजी जाईल अशा प्रकारे नियोजन करावे. विद्यार्थ्यांमध्ये अंतर राखता येईल इतक्या मोठ्या वर्गखोल्या असावेत. सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रकृतीबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे. विद्यार्थ्यांना सर्व नियम आधीच कळवावेत. परीक्षा केंद्रावर एखाद्याला लक्षणे आढळल्यास त्यासाठी विलगीकरण कक्ष असावा, असे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.