राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मार्चमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने सद्यःस्थितीत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सध्या वाढत आहेत. बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर वधारले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. तर बळीराजाला दोन पैसे हाती येत असल्याने त्याचे बिघडलेले गणित कोठेतरी थोडेफार स्थिर होणार आहे.
राजगुरूनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत तालुक्याच्या शेलपिंपळगाव, काळूस, वडगाव घेनंद, कडूस, चास, पाईट, दावडी, निमगाव, वाकी, राजगुरूनगर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल वाशी, मुंबई, पुण्याकडे पाठविला जातो. काही प्रमाणात स्थानिक विक्रीसाठी व्यापारी तो खरेदी करत असतात.
पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सद्यःस्थितीत वाढली आहे. उन्हाळा आल्याने त्याचे दर वधारले आहेत. स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत वाढली आहे. फळभाज्यामध्ये सध्या काकडी व घेवडा यांची आवक अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही फळभाज्यांचे दर आवाक्यात आहेत. मात्र, दुधी भोपळा, कारली, दोडका, गिलके आदी फळभाज्यांची आवक वाढली आहे.
फळभाज्यांचे किलोचा दर रुपयांत
चाकण भाजी बाजार समितीत मंगळवारी (दि.26) टोमॅटो 50 ते 100, कारली 30 ते 40, दोडका 25 ते 35, भेंडी 15 ते 25, गवार 40 ते 80, कोबी 100 ते 14, फ्लॉवर 5 ते 10, वांगी 20 ते 30, फरसी 35 ते 45, काकडी 5 ते 20, मिरची 55 ते 65, दुधी भोपळा 15 ते 24, शेवगा 15 ते 30, ढोबळी मिरची 30 ते 50, वाटाणा 45 ते 55, गाजर 15 ते 20.
पालेभाज्यांचे जुडीचा दर रुपयांत
गावठी कोथिंबीर 3 ते 8, मेथी 6 ते 10, शेपू 5 ते 9, पालक 5 ते 7 असे भाव मिळत आहेत. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची जुडी छोटी करून दुपटीने विक्री होत आहे.
लिंबू खातोय भाव
यंदा मार्चमध्येच उन्हाचा जोरदार तडाखा वाढला आहे. या उन्हामुळे बाजारात लिंबांची मागणी प्रचंड वाढली आहे. किरकोळ बाजारात 1 ते 3 रुपयांना एक, तर 60 ते 90 रुपये प्रतिकिलोप्रमाणे लिंबांची विक्री होत आहे.