राजगुरूनगर, {रामचंद्र सोनवणे} – खेड तालुक्यात राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. दरम्यान, तालुक्यात लोकसभेसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध माजी खासदार आढळराव पाटील यांच्या अटीतटीच्या लढत होत आहे. या लढतील कोणते पक्ष साथ देतील? कोणते कार्यकर्ते काम करतील? याचे नक्की गणित सद्य स्थितीला सांगता येत नसले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हातचा ठेवून तालुक्यातील नेते सावध भूमिकेतून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. पक्ष बदलण्यासह आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. आगामी विधानसभेचे गणित लक्षात घेत आतापासूनच तालुक्यातील काही नेत्यांना आमदारकीची स्वप्न पडत आहेत. त्या स्वप्नांच्या आधारे त्यांची तयारी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत तालुक्यातील कार्यकर्त्यांची बिघाडी होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत याचे परिणाम पाहायला मिळणार आहेत.
खेड तालुक्यात लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीसाठीआतापासूनच अनेक जण गुढघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. खेड तालुक्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन बलाढ्य पक्ष सक्रिय आहेत, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे. तालुक्यातील 100 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि 80 पेक्षा जास्त सहकारी सोसायट्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत.
दुसरीकडे भाजप उसंडी घेत आहे. तालुक्यातील सर्व बूथचे नियोजन तालुक्यातील पाईट गटातील शरद बुट्टे यांच्याकडे आल्याने तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपचा नियोजनबद्ध प्रचार प्रसार सुरू आहे अनेक युवावर्ग शारदबुट्टे पाटील आणि भाजपचे माजी तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांनी भाजपाकडे आकर्षित केला होता. त्यामुळे शिवसेनेला तालुक्यात तिसरे स्थान असून काँग्रेस, मनसे आरपीआय हे तालुक्यात नावापुरते राहिले आहेत.
काही पक्षांकडे बोटावर मोजण्या इतके नेते
एकाच पक्षाकडे गर्दी जमत आहे तर काही पक्षांकडे बोटावर मोजण्या इतके नेते राहिले आहेत त्यामुळे आगामी विधानसभेची गणिते रणनीती आतापासून काही युवा नेतृत्व करू लागली आहेत.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये अनेक पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे जातो तो पक्षातील आपल अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर अडचणीत आलेले नेते मोठ्या पक्षाच्या सानिध्यात जात आहे नव्हे त्यांना ईडीची भीती वाटत असावी म्हणून पक्ष बदल होत आहेत.
शिवसेनेच्या दोन्ही गटांना जिकरीचे
खेड तालुक्यात शिवसेनेकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा सामना करण्यासाठी सध्यातरी सक्षम नेतृत्व उदयास आले नाहीत. स्व. आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर शिवसेनेला घरघर लागली आहे.
तालुक्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गटात विभाजन झाल्याने आगामी निवडणुकीसाठी दोन्ही गटांना जिकिरीचे होणार आहे, त्यातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घड्याळाकडे धाव घेतल्याने उर्वरित कार्यकर्त्यांवर कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती बेतली आहे.
उमेदवारांच्या मतांवर परिणाम
लोकसभा निवडणुकीच्या अगोदरच राजकीय भूकंप होत आहेत. भाजपच नेते अतुल देशमुख यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची तुतारी हाती घेतल्याने खेडमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा निर्णय घेतल्याने शिरूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या मतांवर परिणाम होणार का? हे लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे. तर त्या आधी ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचीही तालुकाभर चर्चा रंगली आहे.