राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – सहकार आणि शिक्षण ही दोन्ही क्षेत्र पक्षीय राजकारणाची नसतात तर ती लोककल्याणाची असतात हे ओळखून आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी बहुममेत योगदान देणारे दादासाहेब आपटे हे कर्मयोगी होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी राजगुरूनगर येथे केले.
राजगुरूनगर सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्व. परशुराम भगीरथ आपटे यांच्या जयंती निमित्ताने राजगुरूनगर सहकारी बँकेच्या वतीने सुंदर जगण्यासाठी या विषयावर राजगुरूनगरमधील भारत माता व्यासपीठावर प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालक किरण आहेर, विजय डोळस, राजेंद्र सांडभोर, सागर पाटोळे,समीर आहेर, सुरेश कौदरे, गौतम कोतवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, सरव्यवस्थापक अमृत टाकळकर, संजय ससाणे, दिलीप मलघे यांच्यासह बँकेचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, कर्म सेवामय झाले की जीवन कृतार्थ होते. जीवनाची सुंदरता ही आयुष्यभर जपलेल्या मुल्यांवर अवलंबून असते. ज्याला धनाची आणि मनाची योग्य गुंतवणूक करता येते, त्याला जीवन सुंदर करता येत. परस्पर प्रेमभाव आणि विश्वास हाच सुंदर जीवनाचा पाया असते.
सुंदर जगण्यासाठी उत्तम सवयी, सकारात्मक दृष्टिकोन, प्रयत्नांची पराकाष्टा, स्नेहभाव, ताण तणावमुक्त होण्यासाठी छंद जोपासला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी, सूत्रसंचालन बँकेचे मुख्य कार्यकारित अधिकारी शांताराम वाकचौरे यांनी तर उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी आभार मानले
साधेपणातही आनंद सौंदर्य आणि सामर्थ्य
सध्या संपत्तीचा हव्यास, अतिरेकी चंगळवाद, मूल्यहीन जगणे यामुळे जीवन सौंदर्याची आणि संस्कृतीची हानी होत आहे. माणसाला पैसा, गाडी, बंगला, प्रसिद्धी अशा वेडाने ग्रासले आहे. साधेपणातही आनंद सौंदर्य आणि सामर्थ्य असते, हे दादासाहेब आपटे यांनी स्वकर्तृत्वाने सिद्ध केले होते, असे प्राचार्य डॉ. पाटणे यांनी नमूद केले.