नारायणगाव,(वार्ताहर) – देशाची ध्येयधोरणे ठरवण्यात खासदाराची भूमिका महत्त्वाची असते. मी पंधरा वर्षे खासदार म्हणून लोकसभेत या भागाचे प्रतिनिधित्व केले. पण कधीही गल्लीत फिरणार नाही, अशी सर्वसामान्यांना कमी लेखणारी बेताल वक्तव्ये केली नाही. मी इथल्या गल्लीत फिरून लोकांच्या समस्याही सोडविल्या आणि दिल्लीतही आवाज उठवला, असा उपरोधिक टोला शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला.
आढळराव पाटील यांच्या जुन्नर तालुक्यातील मॅरेथाॅन दौऱ्यास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. या गावभेट दौऱ्यात जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद, कांदळी, वडगाव, बोरी खुर्द, बोरी बुद्रुक, औरंगपुर अशा अनेक गावांत वाजतगाजत त्यांचे स्वागत झाले. या प्रसंगी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे,
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, बाजार समिती सभापती संजय काळे, पुणे जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना तालुकाप्रमुख सूर्यकांत ढोले, दूध संघाचे बाळासाहेब खिलारी, भाजपाचे भगवान घोलप, जिल्हा नियोजन समितीचे विकास दरेकर, महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुप्रिया लेंडे यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आढळराव पाटील पुढे म्हणाले , मी संसदेत आपल्या भागाचे प्रश्न घेऊन योग्य पद्धतीने मांडणी केली, समोरच्या उमेदवारापेक्षा कितीतरी जास्त प्रश्न सोडविण्याचे काम केले, मात्र त्याची अतिशयोक्ती केली नाही. सर्वसामान्यांनी ज्यांना आपला प्रतिनिधी म्हणून दिल्लीत पाठवलं त्याने दिल्लीत काम करताना इथल्या जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम केले पाहिजे.
माझ्या दृष्टीने इथली जनता हेच माझे कुटुंब आहे. गेली २० वर्षे ८०० हून अधिक जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सोडविले. खासदार झाल्यावर ‘खासदार आपल्या दारी’ उपक्रम सर्वप्रथम सुरू केला आणि प्रत्येक गावागावात भेटी दिल्या, लोकांच्या अडचणी सोडविल्या. या भागातील मोठे प्रकल्प मार्गी लावायचे असतील, तर त्यांच्या विचारांचा खासदार दिल्लीत गेला पाहिजे.
हडपसरनंतर जुन्नरमध्ये प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी हडपसरमधून मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर आढळराव पाटील यांनी आज जुन्नर तालुक्यात मॅरेथाॅन दौरा केला. आजी माजी आमदार आणि पदाधिकारी सोबत असल्याने जुन्नर तालुका आढळराव पाटील यांच्यासाठी सोपा जाणार असल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले.
गेल्या पाच वर्षात खासदार नसताना आढळराव पाटील यांनी जमिनीवर राहून गावागावात राज्य शासनाकडून मोठा निधी आणला. विद्यमान खासदारांना गावागावातून लोकांनी निधीसाठी निवेदने दिली. मात्र त्यांनी कामे केली नाही. त्यामुळे फक्त पोपटपंची करणारा नव्हे, तर प्रत्येकाच्या सुखदुःखात अडी अडचणीत धावून येणारा खासदार आपल्याला हवा आहे. -अतुल बेनके, आमदार जुन्नर
खासदार नसतानादेखील आढळराव पाटील सतत जनतेत वावरत राहिले, लोकांची कामे करत राहिले म्हणून त्यांना आम्ही कधीच माजी म्हटलो नाही. काही झालं तरी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सर्वसामान्यांसाठी 24 तास उपलब्ध असणारे खासदार म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील असून ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आम्हाला आहे. -शरद सोनवणे, माजी आमदार जुन्नर
वडगाव कांदळी