भाजपातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे आपल्या स्वगृही परतणार असल्याच्या बातम्या चर्चेत आहेत. यामागेही भाजपचे काही डावपेच नक्कीच असणार? त्याबाबत…
काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय कारकीर्द सुरू करणारे सर्व नेतेमंडळी कधी पक्ष सोडून गेले तरीही आयुष्याच्या अंतिम चरणात वापस येतात ते आपल्या मूळ पक्षात! असं विधान गेली चार दशकं केवळ राजकारण अगदी जवळून पाहताना केव्हातरी कानावर पडलं होतं. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आसाममध्ये राजकीय वार्तांकन करताना त्याचा प्रत्ययही अनेक वेळा घेतला होता. डॉ. सुब्रमण्यम स्वामी जनसंघाचे! अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी पंगा घेऊन बाहेर पडलेले. 2013 मध्ये ते भाजपमध्ये आले. याचप्रकारे अशोक चव्हाण, मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये येऊ शकतात. काँग्रेस त्यांना पक्षात घेईल? की संकटसमयी साथ सोडणार्या व्यक्तींना काँग्रेसने पुन्हा पक्षात थारा देऊ नये?
2020 मध्ये एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यावर आरोपांची राळ उठवली. तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावीन, असं म्हणत ते राष्ट्रवादीत गेले. आमदार बनले. मध्यंतरी त्यांना हार्ट अटॅक आला होता. तेव्हा त्यांना फडणवीसांनी एअर अॅम्ब्युलन्सची सोय केली होती. तेव्हापासूनच खडसे स्वगृही परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. चर्चा जोरात तेव्हा सुरू झाली जेव्हा त्यांची सून रक्षा खडसे यांना भाजपने रावेर मतदारसंघात लागोपाठ तिसर्यांदा उमेदवारी जाहीर केली. सून निवडून येण्यासाठी सासरे मदतीला येणारच! अखेर ते आलेच! पण त्यांच्या घरवापसीला दोन कंगोरे निश्चित आहेत. एक भाजप ‘अब की बार चार सो पार’ म्हणत असेल तरीही ते तेवढं सोपं नाही याची त्यांना कल्पना आहे. आणि म्हणूनच एकेक जागा पक्की करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. रावेर, जळगाव या भागात खडसेंच्या असलेल्या प्रभावाचा फायदा घेत भाजपने आपल्या एक दोन जागा पक्क्या करून घेतल्या आहेत. दुसरा कंगोरा आहे देवेंद्र फडणवीस यांचा! 2014 मध्ये मुख्यमंत्री बनलेले फडणवीसांची सध्या उतरती भाजणी सुरू आहे. आता ते उपमुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबरमध्ये होणार्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत खडसेंचा वापर करून देवेंद्र फडणवीसांचे पक्षात खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
खडसे हे जरी भाजपात प्रवेश करणार असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी पक्षातच राहणार आहेत, असं म्हटलं. मात्र, यात विधानसभा निवडणुकीपर्यंत त्या भाजपमध्ये येऊ शकतात. कारण 2019 मध्ये त्यांचा पराभव केवळ अडीच हजार मतांनी झाला होता. घोटाळ्यांचे आरोप केलेले अजित पवार, अशोक चव्हाण जर भाजपला चालू शकतात तर भोसरीच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात अडकलेले मूळचे त्यांचेच खडसे का नाही चालणार? भलेही त्या प्रकरणात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला असेल.
भाजपने एकेक जागेचा हिशेब करत खडसेंना पक्षात घेतले, तर तिकडे मविआतील तीन पक्ष अजूनही जागावाटपावरून अडलेले राहतील. सातार्याच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी एकमेकांना ऑफर्स देत आहेत. ‘अलीकडच्या काळात तीन-तीन महिने फायलींवर सह्याच होत नाहीत. सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा सही करायला हात का थरथरतो, हे मला माहिती नाही, त्यांच्या हाताला लकवा भरला की काय? हे बघायला पाहिजे’, हे विधान होत काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारचे कर्ते करविते शरद पवार यांचं! अर्थात, हे विधान होतं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अडकून पडलेल्या काही फाइल्सविषयी; आजपासून दहा वर्षांपूर्वी!
पृथ्वीराज चव्हाण यांनीही साहजिकच त्यास उत्तर दिले. ऐन निवडणुकीच्या घोषणेअगोदर काही कंत्राट मंजूर करण्याचा आग्रह केला होता, असा गौप्यस्फोट करताना त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचीच चलती होती. ‘पवारांचा आदेश सर आँखों पर’ असायचा! त्याला ग्रहण लागलं अशोक चव्हाण मुख्यमंत्री बनल्यापासून! अशोक वृक्ष कोणालाही सावली देऊ शकत नाही, चिडलेल्या अजित पवारांनी आपल्या मनातील जळजळ एकदा व्यक्त केली होती. पण ‘आदर्श’वादी अशोक चव्हाण 23 महिन्यांत गेले आणि पृथ्वीराज आले आणि परिस्थिती हाताला लकवा भरेपर्यंत पोचली. आता परिस्थिती बदलली आहे. अशोक चव्हाण भाजपवासी झाले आहेत तर अजित पवार भाजपच्याच साह्याने एक नव्या पक्षाची छत्री उघडून बसले आहेत. म्हणजे तसे दोघेही भाजपवासी!
अजित पवार जेव्हा काकांना सोडून भाजपकडे गेले तेव्हा शरद पवार आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील समाधीवर गेले तेव्हा त्यांचं स्वागत करायला तयार होते पृथ्वीराज चव्हाण! एक प्रकारे पुतण्याकडून दुखावल्या गेलेल्या पवारांना साथ मिळाली एके काळी ‘लकवा’ मारलेल्या हातांचीच. आणि आज पवारांना सातारा मतदारसंघासाठी आठवण झाली ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच. कारण श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढविण्यास नकार दिला आणि पवारांना आठवण झाली पृथ्वीराज चव्हाण यांची. पण प्रश्न होता चिन्हाचा. चव्हाण तुतारीवर लढण्यास तयार नाहीत. काँग्रेसला पूर्ण वेळ देणारा अध्यक्ष असावा, अशी मागणी करणार्या 23 काँग्रेस नेत्यात पृथ्वीराज चव्हाणांचा समावेश होता. पण आता त्यांनी सातार्याची जागा केवळ काँग्रेसकडूनच लढणार ही भूमिका घेतल्याने दिल्ली दरबारी त्यांचं वजन निश्चितच वाढलं आहे. सांगलीच्या जागेसाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला आहे. तीनही पक्ष परिपक्वता दाखवतील अशी अपेक्षा!