नवी दिल्ली: वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी आणि ते संपादक असलेल्या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. गोस्वामी आणि त्यांच्या वृत्तवाहिनीने चर्चात्मक कार्यक्रमादरम्यान प्रसारणाच्या नियमांचा भंग केला असल्याचा आरोपही कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहीले आहे. “रिपब्लिक टीव्ही’वर मंगळवारी प्रसारित झालेल्या चर्चेच्या कार्यक्रमादरम्यान गोस्वामी यांनी निवेदक म्हणून स्वैर, दिशाभूल करणारे आणि द्वेष पसरवणारी वक्तव्ये केली, असा आरोप या पत्रामध्ये करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात पालघर येथील हत्या प्रकरणावर चर्चा झाली होती. या प्रकरणात दोन साधूंसह तिघा जणांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. त्यासंदर्भातील चर्चेदरम्यान गोस्वामी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल भाजप आणि कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद झाले. या वाहिनीने “केबल टेलिव्हिजन नेटवर्क रुल्स-1994′ अंतर्गत ठरवण्यात आलेल्या कार्यक्रम संहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप देव यांनी केला आहे.
भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपच्या अन्य काही नेत्यांनी गोस्वामीवरील कथित हल्ल्याचा निषेध केला आहे.