लोणी काळभोर -कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत सहा दिवसांपूर्वी नवीन उजवा मुठा कालव्यात बुडणाऱ्या सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचा मृत्यू झाला होता. तर वडील वाहून गेल्याने ते सहा दिवसानंतरही बेपत्ता आहेत.
आई मृत्युमखी तर बाप बेपत्ता, आई व वडील गेल्याने त्यांची सात ते बारा वर्षे यादरम्यान वय असलेली चार मुले, त्यांचे वय न कळण्याजोगे.. त्याहूनही अधिकची गंभीर बाब म्हणजे हे जोडपे परप्रांतीय.. यामुळे चार मुलांचे काय होणार? हा यक्ष प्रश्न होता; मात्र या मुलांना कुंजीरवाडी ग्रामस्थांनी मायेचा हात दिला आहे.
पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, कोरेगाव मूळ येथील नर्सरी उद्योजक बाप्पू शितोळे, उद्योजक राजू गुंजाळ व कुंजीरवाडी येथील गावकऱ्यांनी आई-वडिलांविना अनाथ झालेल्या या चार अल्पवयीन मुलांना मायेचा हात तर दिलाच. पण त्याही पुढे जाऊन चार मुलांना कपडेलत्ता, उत्तर प्रदेशातील मूळ गावी आजीकडे गेल्यावर आजीसह चार-पाच जणांना पुढील तीन महिने पुरेल एवढा किराणा देऊन गावाकडे रेल्वेने पाठवून दिले.
कुंजीरवाडी येथे नवीन उजवा मुठा कालव्याच्या पाण्यात पोहत असताना, कालव्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या सात वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात सोनी कश्यप (वय 38) या महिलेला जीव गमवावा लागला होता. तर सोनीचे पती अशोक कश्यप (वय 40) हे सोनीला वाचवत असताना कालव्याच्या पाण्यात वाहून गेले. अशोक व सोनी गेले पण त्यांच्या राज (वय 11), रजनी (वय 9), रंजीत (वय 7) व निसू (वय 6) या चार मुलांना सोडून.
अशोक व सोनी यांचा एकही नातेवाईक कुंजीरवाडी अथवा जिल्ह्यात नसल्याने या मुलांचे काय होणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यातच सोनीवर अंत्यसंस्कार करण्यासही अशोकच्या वृद्ध आईने नकार दिल्याने कुंजीरवाडीचे पोलीसपाटील मिलिंद कुंजीर व त्यांचे सहकारी महेश कुंजीर, अमोल खेडेकर, अतुल जवळकर व सुरेश झेंडे यांनी सोनीवर अंत्यसस्कार केले.