पळसदेव -करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. सध्या पळसदेव भागात किराणा दुकाने ठराविकच वेळेत उघडली जात आहेत. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची धावपळ होत आहे.
त्यातच पळसदेवमधील अनेक दुकानदार त्यांच्याकडे उपलब्ध असलेला माल वीस ते तीस टक्के जादा दराने वस्तूंची विक्री करीत आहेत. यावेळी नागरिकांना मदत करण्याचे सोडून चढ्या दराने माल विकून मलिदा लाटण्याच्या मागे लागले आहेत.
पळसदेव, माळेवाडी, लोणी देवकर, डाळज व काळेवाडी या भागात किराणा दुकानदार किराणा मालाची विक्री अधिकच्या दराने करीत आहेत. त्यामुळे आधीच करोनाचा फटका बसला आहे. त्यात दुकानदारांकडून संधी पाहून सुरू असलेली लूट विदारक ठरत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक पुरता बेजार झाला आहे. मालाच्या किमती कशा वाढल्या, याबाबत दुकानदाराला विचारले असता मालच मिळत नाही.
आम्हीच जास्त पैसा देऊन आणला आहे, मार्केटमध्ये मालच शिल्लक नाही, हाच कसाबसा आणलाय, अशी कारणे ग्राहकांनी सांगितली जात आहे.
वास्तविक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक नियमित सुरू आहे. त्यांच्या किमती देखील वाढल्या नाहीत. मात्र, काही दुकानदार जाणीवपूर्वक ग्राहकाची लूट करीत आहेत. साखर, खाद्य तेल, कडधान्य, डाळी, गूळ आदी अनेक वस्तूंची चढ्या दराने विक्री होत आहे.
याबाबत प्रशासनाने तातडीने अधिक किमतीत माल विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.