महाराष्ट्र आणि झारखंडने पक्षाला शिकवला धडा
नवी दिल्ली : महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडची सत्ता भाजपला गमवावी लागली. त्या राज्यांमध्ये गाऱ्हाणी मांडणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांकडे केलेले दुर्लक्ष भाजपला महागात पडल्याचे मानले जात आहे.
भाजपवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे वर्चस्व आहे. त्या दोघांनी आजवर मुख्यमंत्रिपदी विराजमान केलेल्या स्वपक्षीय नेत्यांना पूर्ण पाठबळ देण्याचे धोरण अवलंबले. पक्षांतर्गत मतभेदांना चालना मिळणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. त्यातून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांना फारसा थारा दिला गेला नाही. मात्र, त्याचा फटका भाजपला बसत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला.
अपेक्षित जागांपर्यंत पोहचण्यात त्या पक्षाला अपयश आले. नंतर जुना मित्रपक्ष शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेपासूनही दूर राहावे लागले. एकनाथ खडसे यांच्यासारख्या काही ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपचे संख्याबळ घटण्यामागे तेही एक कारण असल्याची चर्चा आहे.
खडसे निवडणुकीच्याही आधी बराच काळपासून विविध मुद्द्यांवरून भाजपच्या राज्य नेतृत्वाला घरचा आहेर देत होते. मात्र, त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पक्षाच्या पातळीवर झालेले दिसले नाहीत.
झारखंडमध्येही सरयू राय या ज्येष्ठ नेत्याकडे भाजपने दुर्लक्ष केलेले आढळते. त्या राज्यातील महत्वाचे नेते असणाऱ्या राय यांनी मावळते मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या कार्यपद्धतीवर वारंवार आक्षेप घेतला. मात्र, त्याकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष न देण्याची परिणती राय यांच्या बंडखोरीत झाली.
राय यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून थेट दास यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान दिले आणि दास यांना पराभूतही केले. झारखंडमधील सत्ता परिवर्तन आणि दास यांचा पराभव या घडामोडी भाजपसाठी दुहेरी हादरा ठरल्या. त्यामुळे राज्यांमधील स्वपक्षीयांची गाऱ्हाणी ऐकली जावी, असा धडाच महाराष्ट्र आणि झारखंडने भाजपला शिकवला आहे.