नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संधीसाधू आहेत, अशी टीका भाजपच्या अखिल भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे. हिंदुत्वाशी संबंधित महत्वाच्या मुद्दयावर काहीही भाष्य न करण्याबद्दल त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. अयोध्येच्या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी “आपण भाजपबरोबर फारकत घेतली आहे, हिंदुत्वाबरोबर फारकत घेतलेली नाही.’ असे वक्तव्य केले होते. त्यावर रहाटकर यांनी जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्दयावर संधीसाधूपणा करत आहेत. जर त्यांनी हिंदुत्व सोडलेले नाही, तर हिंदुत्वाशी महत्वाच्या मुद्दयांवर ते काही बोलत का नाहीत. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्व जपले, तेच उद्धव ठाकरे यांनी सोडून दिले आहे. बाळासाहेबांना प्राप्त असलेली “हिंदू हृदय सम्राट’ या उपाधीला उद्धव ठाकरे यांनी बदनाम केल्याची टीकाही रहाटकर यांनी केली.
बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाबाबत तडजोड केली नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडून दबाव टाकला गेल्यावर उद्धव ठाकरे हिंदुत्वाचे मुद्देच सोडून देतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत किंवा मध्यप्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याबाबत उद्धव ठाकरे काहीच भूमिका का घेतली नाही? हे मुद्दे हिंदुत्वाशी संबंधित नव्हते का ? असा सवालही रहाटकर यांनी विचारला.
शिवसेनेच्या मुखपत्रातून दिल्लीतील हिंसाचारावर टीका केली गेली. पण “सीएए’बाबत विरोधक गैरसमजूती पसरवत असताना शिवसेनेने काहीच प्रत्युत्तर का दिले नाही, याचे ही उत्तर शिवसेनेच्या नेतृत्वाने द्यायला हवे, असे रहाटकर म्हणाल्या.