नवी दिल्ली – मागील पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 800 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मागील वर्षी (2018) सर्वांधिक 249 दहशतवादी मारले गेले, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारने लोकसभेत दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दले दहशतवादी कारवाया उधळून लावत आहेत. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत दहशतवाद्यांकडून होणारे घुसखोरीचे प्रयत्नही हाणून पाडले जात आहेत, असे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले. त्यांनी मागील पाच वर्षांत ठार झालेल्या दहशतवाद्यांची आकडेवारीही दिली.
2014 मध्ये 104 दहशतवादी मारले गेले. पुढील तीन वर्षांत ती संख्या 97, 140 आणि 210 असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तान सैनिक शस्त्रसंधीचा भंग करून सातत्याने भारतीय हद्दीत मारा करतात. त्या कुरापतींना भारतीय लष्कराकडून चोख आणि निर्णायक उत्तर दिले जाते. चालू वर्षी मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी प्रत्येकी 200 हून अधिक वेळा शस्त्रसंधी भंग केला, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, चालू वर्षी आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 119 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तर 24 जवान शहीद झाले, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी राज्यसभेत दिली.