टाकवे बुद्रुक – माळेगाव खुर्द येथील वरसुबाई माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडीचे आयोजन करण्यात आले. या वेळी दिंडीमध्ये अभंगातून झाडे लावा झाडे जगवा, मुलगी वाचवा देश वाचवा हा सामाजिक संदेश देऊन संपूर्ण माळेगाव गावातून दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली.
भविष्यातील नवा भारत घडवण्यासाठी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वृक्षसंवर्धन यासह वारकरी सांप्रदयचा वारसा वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक सहभाग घेऊन जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत वरसुबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव गाभणे, मुख्याध्यापक मधुकर गंभीरे, राजेंद्र भांड, संतोष बारस्कर, दंडवते, बाळासाहेब गायकवाड, रघुनाथ सातकर यांनी परिश्रम घेतले. माजी सभापती शंकरराव सुपे यांनी बाल वारकऱ्यांना फळांचे वाटप केले. विठ्ठल मंदिरात आरती होवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण झाले होते.