हवेतील घातक घटकांचे प्रमाण वाढले : सार्वजनिक वाहतूक सक्षम होणे आवश्यक
– कल्याणी फडके
पुणे – शहराच्या लोकसंख्येनुसार वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे घातक वायुंचे प्रमाण वाढत आहे. शहरामध्ये प्रवास करताना कार्बन, नायट्रोजन ऑक्साईडसारखे विषारी वायु आपल्या नकळतपणे शरीरात प्रवेश करतात. यामुळे वाहनचालकांना अनावधानाने आजारांना सामोरे जावे लागते. आहोत.
शहरातील वाहनांची संख्या कमी आहे की काय, असा प्रश्न असून दर मोठ्या सण, मुहूर्ताच्या निमित्ताने त्यात वाढ होत आहे. सर्वात महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक अर्थात पीएमपीएमएल (पुणे महानगर परिवहन महामंडळ)च्या बसेसची अवस्था पाहून प्रत्येकाचा कल स्वत:चे वाहन घेण्याकडे असतो. यामुळे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत आणि प्रदूषणामध्ये भर पडत आहे.
शहरातील वाहनांची संख्या सुमारे 38 ते 40 लाखांवर येऊन ठेपली आहे. “एक व्यक्ती, एक वाहन’ याप्रमाणे ही संख्या वाढत आहे. क्लास, कॉलेजमध्ये जाण्या-येण्यासाठी पाल्याला दुचाकी घेऊन देण्याचा ट्रेन्डदेखील वाढत असल्याने या संख्येत भर पडताना दिसत आहे. लाखोंच्या संख्येत वाहने रस्त्यावर धावत असल्याने नकळत आपण प्रदूषणाचे बळी ठरत आहोत. गेल्या काही वर्षांत ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रशासकीय पातळीवरून त्याकडे डोळेझाक केली जात आहे. तर, घरातील प्रत्येक सदस्यासाठी वाहन खरेदीच्या मोहाने आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.
पीएमपीच्या डिझेल बसेसमुळे भर
पीएमपीच्या डिझेल बसेसमुळे देखील धुराचे प्रमाण वाढत आहे. बसचे व्यवस्थापन आणि देखभाल नसल्याने यामुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये वाढ होताना दिसत आहे. डिझेल बसेसच्या जवळून जातानासुद्धा धुराचा त्रास होत असल्याचे नागरिक सांगतात. याबाबत पीएमपी प्रशासनाशी संपर्क साधला असता, सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर म्हणाले, “बसेसमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याचा आम्ही अधिकाधिक प्रयत्न करत आहोत. सीएनजी आणि ई-बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याची पीएमपीचा मानस आहे. त्यामुळे यापुढे सीएनजी आणि ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत.”
उपाय काय ?
वाहनांची पीयूसी करुन घेणे
अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा वापर करणे
कमी अंतरासाठी वाहनांचा वापर न करणे
वाहनांची देखभाल करणे
सायकलचा अधिकाधिक वापर करणे
पीएमपीच्या डिझेल बसेसमुळे भर
रिक्षांचा सार्वजनिक वाहतूक आणि प्रदूषण दोन्हीलाही हातभार शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असणाऱ्या पीएमपी बसेस ऐवजी रिक्षांना पसंती मिळत आहे. रिक्षा ही शहरातील पूरक वाहतूक व्यवस्था मानली जाते. मात्र याच रिक्षांच्या “फिटनेस’ची अवस्था मात्र बिकट आहे. रिक्षांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायुंमुळे अन्य वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे 60 ते 70 हजार रिक्षांची संख्या असणाऱ्या या शहराच्या प्रदूषणामध्ये भर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.