प्रशासनाचे काही विभाग नाचवतात कागदी घोडे
– एम. डी. पाखरे
आळंदी – उभ्या महाराष्ट्राला तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असणाऱ्या अलंकापुरी नगरीत आषाढी व कार्तिकी अशा दोन मोठ्या वाऱ्या, सोहळे प्रथा परंपरेप्रमाणे शेकडो वर्षांपासून सुरू आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक अलंकापुरीत दाखल होतात. त्यामुळे या भाविकांना सेवा-सुविधा देण्याचे काम प्रशासनाचे आहे; मात्र प्रशासनाची काही खाती वगळता इतर सर्व खात्यांचा कारभार केवळ कागदी घोडे नाचवतात. कारण, संपूर्ण यात्रा कालावधीत त्यांचे नियोजन कोलमडले दिसते, त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार गेल्या अनेक सोहळ्यांमधून सिद्ध झाला आहे. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीमध्ये ही प्रथा कायम राहणार की, तोडण्यात प्रशासनाला यश येते हे लवकरच स्पष्ट होईल.
माऊलींवर असणाऱ्या अतुट श्रद्धेपोटी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण भारतातून भाविक दरवर्षी आषाढी व कार्तिकी या दोन्ही वाऱ्या पूर्ण करतात. त्यामुळे यात्रा काळात आलेल्या लाखो भाविकांना सेवा-सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनसह स्थानिक प्रशासनाची देखील असते. त्यासाठी वारीच्या अगोदर 15 दिवस प्रथम नियोजन व नंतर आढावा अशा दोन महत्त्वपूर्ण बैठका सर्व संबंधित खात्यांना निमंत्रित करून घेतल्या जातात.
दरवर्षीसारखा अनुभव यंदा न येण्यासाठी प्रत्येक विभागाला सतर्क राहण्यास सांगितले असून त्यापद्धतीचे आदेश दिले आहेत. तसेच यंदा ज्या विभागाचे नियोजन यात्रा काळात ढिसाळ राहिल त्या विभागास यात्रेनंतर समज दिली जाईल. तसेच बीएसएनएल 10 वर्षांपासून सेवा देण्यात असमर्थ ठरत असल्याची भाविकांची ओरड असल्याने यंदा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
– संजय तेली, प्रांताधिकारी, खेड
दरवर्षी यात्राकाळात काही विभागांचे नियोजन ढासळलेले दिसते. मात्र, यंदा तसे न होण्यासाठी प्रत्येक विभागाला सक्त ताकीस दिली आहे. तसेच आगामी बैठकीतही त्यांना तशी ताकीद दिली जाईल. व भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी दक्ष राहू.
– समीर भूमकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका