कराड – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर बसस्टॉपवर एका इसमास दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हातचलाखी करून काढून घेऊन पलायन केल्याची घटना बुधवारी घडली. याबाबतची फिर्याद सयाजी तुकाराम बाबर (रा. जखिणवाडी, ता. कराड) यांनी शहर पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सयाजी बाबर हे मूळचे जखणिवाडीचे मात्र ते मुंबई येथे वास्तव्यास असतात. ते वारणा, जि. कोल्हापूर येथे लग्न समारंभाला जाण्यासाठी नांदलापूर बसस्टॉपवर उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण बाबर यांच्याजवळ आले. आम्ही पोलीस आहोत, तुम्ही अंगावर सोने घालायचे नाही. ते काढून तुमचे खिशात ठेवा असे म्हणून त्यांनी बाबर यांचा रूमाल मागून घेऊन बाबर यांच्याकडे असलेली सुमारे 40 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व 16 हजार रुपये किमतीची 4 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून रूमालात बांधल्यासारखे करून त्यातील हातचलाखीने सोन्याचे दागिने काढून रूमाल बाबर यांच्याकडे देऊन निघून गेले. बाबर यांनी रूमाल उघडून पाहिला असता त्यामध्ये चैन व अंगठी नसल्याचे दिसून आले.