सासुरवाडीत लपलेला चोरटा मुद्देमालासह पोलिसांकडून जेरबंद
लोणावळा – पुतण्याचा विवाहसमारंभ आटोपून एका खासगी मोटारीमधून उंब्रज ते नवी मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशाची दागिने आणि अन्य साहित्य असलेली बॅग घेऊन मोटारसह पोबारा करणाऱ्या मोटार चालकाला अवघ्या 20 तासांमध्ये बेड्या ठोकल्या. चोरट्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश मिळाले आहे. मोटार चालक अमित आप्पासो चव्हाण (रा. गोदरेज कॉलनी, विक्रोळी, मुंबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी व्यावसायिक दिलीप सपकाळ (रा. शिवाजीनगर, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप सपकाळ हे त्यांच्या पुतण्याच्या लग्नासाठी उंब्रज येथे गेले होते. तेथून ते गुरुवारी (दि. 9) अन्य एका प्रवाशासह एका खासगी मोटारीतून (एम.एच. 42 ए.एस. 5081) मुंबई येथे परतत होते. प्रवासादरम्यान गोडगोड बोलून मोटार चालकाने सपकाळ यांची संपूर्ण माहिती काढून घेतली. लोणावळा येथे पोचले असता मोटार चालकाच्या विनंतीवरून चहापाणी घेण्यासाठी ते लोणावळ्यातील वलवण भागात असलेल्या “एन एच 4′ या धाब्यावर थांबले. त्यावेळी सपकाळ यांनी सुमारे साडेअकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व अन्य साहित्य असलेली त्यांची बॅग मोटारीच्या डिकीत ठेवली होती.
दरम्यान फिर्यादी सपकाळ व त्यांच्या सोबतचा अन्य प्रवासी हे चहापाणी करीत असताना अमित त्यांना ढाब्यावर सोडून बॅगेसह मोटार घेऊन पसार झाला. शोध घेवूनही तो मिळून न आल्याने म्हणून सपकाळ यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यास धाव घेतली. विशेष म्हणजे सपकाळ तसेच त्यांच्या सहप्रवासी यांना या मोटारीचा क्रमांक किंवा आरोपी चालक याच्या नाव, पत्याची काही एक माहिती नव्हती.
लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सामील प्रकाश, पोलीस शिपाई जे. व्ही. देवकर, आर. एम. मदने यांनी केवळ आरोपीच्या व मोटारीच्या वर्णनावरून उंब्रज ते लोणावळा मार्गातील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. त्या आधारे माग काढत मोटारीचा क्रमांक मिळविला. त्यावरून पुढील माहिती मिळवून केवळ 20 तासांत मोटारीचा बारामतीपर्यंत माग काढला. अखेर पहाटे साडेचार वाजता या प्रकरणातील आरोपी गाडी चालक अमित चव्हाण यास त्याच्या सासुरवाडीतून ताब्यात घेतले.
या गुन्ह्यातील फिर्यादी दिलीप शांताराम सपकाळ (वय 40) हे सातारा येथील असून, ते 1991 ला मुंबई येथे व्यवसायानिमित्त आले होते. सुरुवातीला त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. मुलीच्या लग्नासाठी अकरा तोळे सोने करून ठेवलेले होते. अथक परिश्रमातून पोलिसांनी त्यांना त्यांचा चोरीस गेलेला ऐवज मिळवून दिला.