पुणे व नागपूरमध्ये तिन्ही शाखांमध्ये सरसकट 10 टक्के
आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई (प्रतिनिधी) – दहावी परिक्षेतील अंतर्गत गुण रद्द केल्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई व आयसीएसई विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्य मंडळातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाची संधी कमी असल्याने निर्माण झालेला तिढा अखेर सुटला. राज्याचे नवनियुक्त शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देतानाच अकरावी प्रवेशाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सायन्स 5 टक्के आणि कला व वाणिज्य शाखेच्या 8 टक्के तसेच पुणे व नागपूरमध्ये तिन्ही शाखांमध्ये सरसकट 10 टक्के जागा वाढविण्याची घोषणा शेलार यांनी केली. जागा वाढवितानाच उद्या, 19 जूनपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही त्यांनी जाहिर केले.
दहावीतील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण बंद केल्याने सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांचे गुण हे दहावीतील राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा जास्त होते. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याचा मार्ग अवघड झाला होता. त्यासंदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी होती.
यांसदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची पालक व विद्यार्थ्यांनी भेट घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण खाते काढून घेत त्या विभागाची जबाबदारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे शेलार यांनी अकरावी प्रवेशावर तोडगा काढताना जागा वाढवण्याची घोषणा केली.
ही वाढ या क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाकरिता नोंदणी केलेले राज्यमंडळ आणि सीबीएसई व आसीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचा कल असलेल्या कनिष्ठ महाविद्यालया व्यतिरिक्त अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही जागा वाढवून देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. या महाविद्यालयांच्या मागणीनुसार व त्यांची गरज तपासून वाढीव जागा विभागिय शिक्षण उपसंचालक स्तरावर मंजूर करण्यात येती, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. तसेच जुलै 2019 मध्ये पुरवणी परीक्षा व यानंतर इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सदर वाढीव जागेची टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून राज्य मंडळाची संलग्नित असलेल्या शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी व विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन व्हावे, या हेतूने भाषा व समाजशास्त्र या विषयातील अंतर्गत मुल्यमापन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयामुळे राज्यातील इयत्ता दहावीच्या निकालात लक्षणीय घट झाली होती. मार्च 2019 मध्ये दहावीच्या राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेकरिता 16 लाख 77 हजार 267 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. व त्यापैकी 12 लाख 66 हजार 861 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 75.53 टक्के इतकी आहे, असेही शेलार यांनी सांगितले.