नगर -महाराष्ट्राच्या वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री पांडूरंगाच्या चरणी लिन होण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून लाखो भक्तांची पावले चालू लागली आहेत. नगर जिल्हा, करमाळा टेभुर्णी ते पंढरपुर या मार्गावर सुमारे अडीच लाख वारकरी मार्गस्थ होण्यास सुरुवात झाली आहे.
परंतु महामार्गावर रस्ता नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामांमुळे रस्त्याची अवस्था दयनिय झाली आहे. यामुळे अनेक वारकऱ्यांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या वर्षीच्या दिंडीसाठी प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती, सूचना फलक, रुग्णवाहिका, आपत्कालीन यंत्रणा, शुद्ध पाणी, आरोग्य विषयक सुविधा व नियोजनासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा, अशा आशयाचे निवेदन वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ राऊत यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले आहे.
याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यात येऊन वारकऱ्यांची वारी व्यवस्थीत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी नंदलाजी कोठारी, सुभाष राऊत उपस्थित होते.