महापौर वाकळे ः शहर स्वच्छते बाबत घेतली आढावा बैठक
नगर -शहर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये महानगरपालिकेचा क्रमांक खाली घसरला. याबाबत शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये असलेल्या बाबींची माहिती घेतली. शहरामध्ये स्वच्छता निरिक्षक व मुकादम यांनी नेमून दिलेल्या आपल्या भागात स्वत: फिरून स्वच्छते बाबत कार्यवाही करावी. तसेच स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 100 च्या आत नंबर येण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून मनपाच्या घंटागाडीत किंवा कचराकुंडीमध्ये टाकावा. कोणीही रस्त्यावर कचरा टाकू नये. नागरिक रस्त्यावर कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.असा ईशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला.
शहर स्वच्छते बाबत महापौर वाकळे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपमहापौर मालनताई ढोणे, सभागृह नेते स्वप्निल शिंदे, स्वच्छता निरिक्षक कुमार सारसर, आर.सी.रामदिन, के.के.देशमुख , पी.व्ही.रामदिन, बिडकर, भांगरे, प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, अंबादास सोनवणे, अशोक साबळे, नाना गोसावी, स्वच्छता दूत डॉ.प्रा.आश्लेषा भांडारकर ,स्वच्छता रक्षक समितीचे प्रतिभा धूत, शशि बिहाणी, सुधा खंडेलवाल, ज्योती दिपक, किरण कालरा, डॉ.अविनाश भांडारकर, अंजू कुथुरिया, अनु गाडेकर पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आदी उपस्थित होते.
समितीच्या सदस्य शहरामध्ये विविध ठिकाणी फिरून स्वच्छते बाबत जनजागृती करित आहेत. स्वच्छता रक्षक समितीने मनपाद्वारे स्वच्छता केल्यानंतर रस्त्यावर कचरा करणा-या नागरिकांना मज्जाव करून त्यांच्या मानसिकतेत व सवयीमध्ये सकारात्मक बदल घडून आणण्याकरिता स्वच्छता साक्षता चळवळ उभी केली आहे. या चळवळीतून ओला सुका कचरा वर्गीकरणे , घरगुती खत प्रकल्प, प्लॅस्टिक मुक्त परिसर व स्वच्छता रक्षण या विषयी साक्षरता करण्याचे नियोजन केले असल्याचे महापौर यांनी सांगितले.
स्वच्छता रक्षक समितीच्या सदस्य म्हणाले की, आम्ही काही भागामध्ये स्वच्छता अभियान राबवून त्या परिसरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करणे कचरा रस्त्यावर टाकू नये कचराकुंडीतच टाकावा किंवा घंटागाडीमध्ये टाकावा. तसेच कॉलनीमध्ये असलेल्या ओपन स्पेसमध्ये खड्डा घेवून त्यामध्ये कच-याची विल्हेवाट लावणे आदी बाबत जनजागृती करित आहोत.
आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग म्हणाले की, मनपाकडे कचरा संकलनाकरिता घंटागाडया लवकरच उपलब्ध होणार आहेत. तो पर्यत आहे त्या यंत्रणाचा वापर करून कचरा संकलनाबाबत सुचना दिल्या. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे आवश्यक आहे. सुक्या कच-या पासून कोणताही त्रास होत नाही. परंतु ओल्या कच-यापासून वास येतो. ओला कचरा जवळ असलेल्या कचराकुंडीत किंवा घंटागाडीमध्ये टाकावा. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा कचराकुंडीतच टाकावा. तसेच कॉलनी जवळ असलेल्या ओपन स्पेसमध्ये कच-याची विल्हेवाट लावून खत निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात यावे.