राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे लोकसभा निवडणुकीच्या पराभवापासून अधिकच सक्रिय झालेले दिसताहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही महाराष्ट्रात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला असून पवार घराण्यातील एका वारसदारालाही मावळात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. असे असतानाही पवार साहेब दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तितक्यात तडफेने सक्रिय झाले आणि ते राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर रवाना झालेले दिसले. सतत कार्यरत राहणे हे पवारांचे वैशिष्ट्य आहे. जयपराजय त्यांना विचलित करू शकत नाही हा त्यांच्या स्वभावातील विशेष गुण आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांनी दाखवलेल्या सक्रियतेचे तसे अप्रूप नाही. या सक्रियतेबरोबरच त्यांनी बोलण्यातही चांगलीच आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे.
कालच पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी बोलताना लोकसभा निकालाबाबत निवडणूक अधिकाऱ्यांवरच पक्षपातीपणाचा थेट ठपका ठेवला आहे. त्यांनी याविषयी जो तपशील दिला आहे तो अधिक धक्कादायक आहे. इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्याच मतदारयंत्रात सेटिंग करतात, असेही ते म्हणाले आहेत. याविषयी काही तज्ज्ञांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी काल केला आहे. मतदान यंत्रावर केलेले मतदान दुसरीकडेच नोंदवले जात असल्याचे आपण डोळ्याने पाहिले असल्याचे त्यांनी मध्यंतरी नमूद केले होते. आता अधिकाऱ्यांवरच या घोळाचा ठपका त्यांनी ठेवला आहे. याविषयी मित्र पक्षांना बरोबर घेऊन आणि तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याने त्यांनी सांगितले आहे.
शरद पवार मोदींविषयी फार आक्रमक बोलत नाहीत असाही त्यांच्यावर एक आरोप होता. पण आता ते मोदींच्या विरोधातही अत्यंत आक्रमक वक्तव्ये करू लागले आहेत. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला त्यासंबंधातही त्यांनी धाडसी विधान केले आहे. हवाईदलाने पाकिस्तानी हद्दीत नव्हे तर काश्मीरच्याच हद्दीत हल्ला केला होता, असे ते म्हणाले आहेत. लोकांना प्रत्यक्ष ताबारेषेच्या संबंधात नीट माहिती नसते याचा लाभ घेऊन मोदींनी लोकांची पद्धतशीर दिशाभूल केली, असेही ते म्हणाले आहेत. अर्थात, त्यांनी आता अशी विधाने करण्याला फार अर्थ नाही. कारण त्याचा त्यांना आता राजकीय लाभ मिळण्याची वेळ निघून गेली आहे.
निवडणूक प्रचार काळात त्यांनी मोदींच्या विरोधात अशी आक्रमक विधाने केली असती तर त्याचा निदान काही राजकीय लाभ तरी झाला असता. वेळ निघून गेल्यानंतर पवारांनी अशी आक्रमकता दाखवण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीचेही कारण असू शकते. मोदींच्या शपथविधी समारंभात त्यांना पाचव्या रांगेचा दिलेला पास, प्रफुल्ल पटेल यांना विमान खरेदी प्रकरणात बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हीसुद्धा पवारांनी मोदींच्या विरोधात स्वीकारलेल्या आक्रमक धोरणाची तत्कालिक कारणे असू शकतात. पाच महिन्यांनंतर होणारी विधानसभेची निवडणूक ही पवारांच्या राजकीय आयुष्यातील एक निर्णायक लढाई असणार आहे. त्यामुळेही त्यांना मोदी आणि भाजपच्या विरोधात आक्रमक धोरणच स्वीकारावे लागले असावे.
अर्थात, हे सगळे खरे असले तरी पवारांच्या पक्षासाठी नुसती शाब्दिक आक्रमकता त्यांच्यासाठी पुरेशी नाही. त्यांना आपल्या पक्षाचा चेहरा-मोहरा आणि प्रचारतंत्रच बदलावे लागणार आहे. हा बदल आता उर्वरित चार-पाच महिन्यांत शक्य आहे काय हेही पाहावे लागेल. आपल्या पक्षाचा चेहरा ग्रामीण आहे, त्यामुळे पक्षाला आता शहरी चेहरा द्यावा लागेल, असेही ते म्हणाले आहेत. हे एक महत्त्वाचे मर्म त्यांनी ओळखले ते एक बरे झाले. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणजे केवळ सहकार आणि कृषी धोरणाशी संबंधित काम करणाराच पक्ष अशी या पक्षाची ओळख झाली असून त्या क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या असंख्य प्रकरणांचे शुक्लकाष्टही या पक्षाच्या मागे लागले आहे. त्यातून झालेल्या मोठ्या बदनामीतून पक्षाला चार-पाच महिन्यांत बाहेर काढण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे आहे. त्यांच्या पक्षाच्या या बदनामीचे स्वरूप इतके मोठे आहे की, कॉंग्रेसच्या आढावा बैठकीतही राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन स्वबळावर निवडणूक लढवण्याची सूचना अनेक कॉंग्रेस नेत्यांनी उघडपणे केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसविषयी लोकांच्या मनात असलेल्या नाराजीचा आपल्यालाही नाहक फटका बसतो आहे अशी जर भावना कॉंग्रेस पक्षाचीही झाली असेल तर पवारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आमूलाग्र बदल करण्याखेरीज गत्यंतर उरलेले नाही. वास्तविक पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात इतके प्रचंड काम करून ठेवले आहे की, राज्याच्या प्रगतीत त्यांच्या इतके योगदान असणारा नेता आज साऱ्या महाराष्ट्रात नाही. त्यांनी केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातही प्रचंड मोठी उभारणी केली आहे. नुसत्या पुणे शहराचाच विचार केला तर पुण्याजवळ हिंजवडीतल्या राजीव गांधी आयटी पार्कच्या उभारणीचे उदाहरण पुरेसे आहे. आज या आयटी पार्कमुळे सुमारे अडीच-तीन लाख लोकांना तेथे प्रत्यक्ष रोजगार मिळाला असून या आयटीपार्कमुळे पुण्याचे अर्थकारण आणि शहराचा चेहरामोहराच बदलून गेला आहे.
पुण्याजवळील बालेवाडी आणि गहुंजे येथे उभी राहिलेली मोठी क्रीडांगणे ही पवारांचीच देणगी आहे. पुण्याजवळ उभी राहिलेली कृषी संशोधन केंद्रे, शहरातल्या टेकड्यावंर त्यांनी जाणीवपूर्वक केलेले वनीकरण, शहरातल्या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान अशी यादी मोठी आहे. पवारांनी केलेल्या कामांचे गावोगावी चित्रप्रदर्शन भरवले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिमा सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते अशी स्थिती आहे. पण या कामांचे पक्षाने प्रचारात कधीच भांडवल केले नाही ही त्यांची सर्वात मोठी त्रुटी ठरली आहे. पिंपरी चिंचवड शहराचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेला विकास हा साऱ्या देशात आदर्श ठरेल असा आहे. त्याचाही त्यांना राजकीय लाभ उठवता आला नाही. त्यामुळे आता पक्षावरील बदनामीचे मळभ दूर करून प्रचारतंत्रात अनुकूल बदल करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे आवश्यक ठरले आहे. निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र आज शहरात राहतो. त्यामुळे शहरी मध्यमवर्गीयांना जवळ कसे करता येईल हेही त्यांना पाहावे लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जातीपातीच्या जुन्या समीकरणातूनही त्यांना बाहेर यावे लागेल. तरच त्यांची ही नव्याने सुरू झालेली सक्रियता सार्थकी लागेल.