केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना
नवी दिल्ली : नागरिकत्त्व कायद्याविरोधात देशभरातील अनेक ठिकाणी संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. या निदर्शनांना हिंसक वळणही लाभले आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवांना त्वरीत आळा घाला, अशी सूचना दिली आहे. त्याचप्रमाणे देशातील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने हिंसक आंदोलनाला आळा घाला असेही सांगण्यात आले आहे.
‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था, शांतता राखा अशा सुचना राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आलेल्या अफवा आणि खोट्या बातम्यांना आळा झाला, त्यांच्यावर कारवाई करा’, अशाही सुचना करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली आहे. काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तांचं नुकसानही करण्यात आले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी राज्यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात असेही केंद्राने म्हटले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आसाम, त्रिपुरा आणि मेघालयमध्ये उग्र आंदोलन सुरू आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही हे आंदोलन सुरू झाले आहे. दरम्यान मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लाभले. याविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.