नागपूर – शेतकरी प्रश्नावरून चर्चा सुरु असतानाचशिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा धक्कादायक प्रकार आज विधिमंडळात घडला. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. सत्ता नसल्याने भाजप आमदारांची तडफड होत आहे. सभागृहात जे काही घडले. त्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव आमदारांना समजावत आहेत. तर भाजपकडून आशिष शेलार आणि गिरीश महाजन हे भाजप आमदारांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.