पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटी महामंडळाचा महसूल बहुतांशी प्रमाणात घटला आहे, त्यातूनच सध्याच्या परिस्थितीत महामंडळाला तब्बल तीस टक्क्यांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांसाठी ‘आवडेल तेथे प्रवास’ ही योजना सुरु करण्यात येणार असून त्यासाठी पास देण्यात येणार आहेत. हे पास तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर असे तीन पातळीवरचे असणार आहेत. मात्र, आरामदायी आणि वातानुकुलित बसेसच्या पासेसचे दर वेगळे असणार आहेत.
खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध आणि शिवशाहीची स्लिपर कोच अशा बसेस महामंडळाने आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाचा प्रवासी वाढला आहे. मात्र, हे वास्तव असले तरीही त्या प्रमाणात महसूलात वाढ झालेली नाही. कुंपणच शेत खात असल्याने आणि महामंडळाचा प्रशासनावर वचक न राहिल्याने ही परिस्थिती उदभवत असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे, त्यामुळेच हा तोटा सहन करावा लागत असल्याचे प्रशासनाने वारंवार स्पष्ट केले आहे.
त्यामुळेच थेट महसूल मिळविण्यासाठी महामंडळाने उपाययोजना सुरु केल्या आहेत, त्यासाठी महामंडळाच्या वतीने ” आवडेल तेथे प्रवास’ ही योजना सुरु करण्याचा महामंडळाचा मानस होता. महामंडळाच्या वतीने यापूर्वीही अशा प्रकारची योजना सुरु करण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, तरीही काही कारणास्तव ही योजना बंद करण्यात आली होती. मात्र, सध्या महसूल मिळविणे ही काळाची गरज असल्याने ही योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम महामंडळाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीसाठी हे पासेस तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या त्या भागातच
प्रवाशांना प्रवास करता येणार आहेत. तसेच शिवशाही, अश्वमेध, हिरकणी तसेच शिवशाहीच्या स्लिपर कोच बसेससाठी हे दर वेगळे असणार आहेत. या सर्व प्रवासाचे पास हे सवलतीच्या दरात असणार आहेत, त्यामुळे या पासेसला प्रवाशांचा निश्चितपणे प्रतिसाद मिळेल आणि वाहतूक महाव्यवस्थापक माधव काळे यांनी ” प्रभात’ शी बोलताना केला.