श्रीनगर – सुरक्षा रक्षकांच्या वाहतुकीसाठी आठवड्याभरातून दोन दिवस जम्मू श्रीनगर महामार्ग बंद ठेवण्यात येणार अहे. या दोन दिवसांच्या महामार्ग बंदला आजपासून सुरूवात झाली. आज (रविवार) आणि बुधवारी हा महामार्ग नागरिकांच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे. सुरक्षा रक्षकांच्या वाहतुकीच्या ताफ्यामध्ये नागरिकांच्या वाहतुकीचे अडथळे येऊ नयेत म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. आठवड्यातून दोन दिवसांसाठी सर्वसामान्यांच्या वाहतुकीवर असलेले हे निर्बंध 31 मे पर्यंत लागू असणार आहेत.
लोकसभेच्या निवडणूकीसाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा रक्षक तैनात केले जात आहेत. पुलवामा सारखा दहशतवादी हल्ला घडू नये म्हणून सुरक्षिततेची उपाय योजना म्हणून हे निर्बंध घालण्यात आले आहेत, असे अधिकृत प्रवक्त्याने सांगितले. या महामार्गावरील सर्व जोडरस्त्यांजवळ लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. उधमपूरपासून श्रीनगरमार्गे बारामुल्ला पर्यंतच्या मार्गावर हे निर्बंध आठवड्यातून दोन दिवसांसाठी लागू असणार आहेत.