कोंढवा बुद्रुक येथील नागरिकांची ग्वाही : पदयात्रा, नागरिकांच्या गाठीभेटींना जोर
कोंढवा – कोंढवा बुद्रुकचा 1997 साली महापालिकेत समावेश झाल्यानंतर दाट लोकवस्ती, झपाट्याने विस्तारणाऱ्या वसाहती यामुळे या भागात एक ना अनेक समस्या ठाण मांडून होत्या. हा भाग मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित होता. मात्र, ज्येष्ठ नगरसेविका रंजना (नानी) टिळेकर व योगेश टिळेकर यांनी विकास आराखडा मंजूर नसतानादेखील प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर संघर्ष करत नियोजनबद्ध विकास घडवून आणला, पुढे योगेश टिळेकर हे नगरसेवक व आमदार झाल्यानंतर तर, सर्वांगीण विकास साधत कोंढवा बुद्रुक प्रभाग क्र.41 व परिसराचा पूर्णपणे कायापालट केला. त्यामुळेच प्रभाग क्र.41 हा गेल्या 20 वर्षांपासून भाजप-शिवसेना महायुतीचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्यातून मोठे मताधिक्य देवून आमदार टिळेकर यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची ग्वाही येथील नागरिकांनी दिली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघ भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे उमेदवार भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश (आण्णा) टिळेकर यांच्या प्रचारार्थ कोंढवा बुद्रुक प्रभाग क्र.41 मधील साईनगर, गोकुळनगर, टिळेकरनगर, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, काकडेवस्ती आदी भागांत पदयात्रा व नागरिकांच्या भेटीगाठींचे आयोजन केले होते. त्यावेळी येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवाळीप्रमाणे फटाक्यांची आतषबाजी करत सडा-रांगोळी काढुन, फुलांचा वर्षाव, औक्षण करत जोरदार स्वागत केले. या पदयात्रेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे, युवानेते गणेश कामठे, नगरसेविका रंजना टिळेकर, वृषाली कामठे, नगरसेवक विरसेन जगताप, स्वीकृत नगरसेवक सतीश मारकड, अनिल येवले, तुषार कदम, संभाजी कामठे, सुनील कामठे, राहुल टिळेकर, हरीष टिळेकर व हजारो नागरिक उपस्थित होते.
येथील स्थानिक नागरिक म्हणाले, आमदार टिळेकर हे आमच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक असून गेल्या 20 वर्षांपासून आमच्या सुखदुःखात व अडीअडचणी सोडविण्यासाठी अहोरात्र झगडून या भागाचा विकास करत आहेत. येथील गोरगरीब नागरिकांनी पै-पै करून स्वःतच्या हक्काची घरे बांधली आहेत. ही घरे बांधताना सर्वोतपरी सहकार्य तर केलेच परंतु, पालिकेने अनेकदा ही घरे अनधिकृत ठरवत कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, आमदार योगेश टिळेकर हे आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने आमच्या घरांच्या एका विटेलाही धक्का लागू दिला नाही. त्यानंतर विधानसभेत पाठपुरावा करून ही घरे नियमित करून घेतली. त्यामुळे येथील 100 टक्के जनता कायमच टिळेकर यांच्या पाठीशी उभी आहे. या बालेकिल्ल्यातून विक्रमी मताधिक्य देऊ, असे त्यांनी सांगितले.