उद्धव ठाकरे यांचा पीकवीमा कपंन्या आणि बॅंकांना इशारा
मुंबई : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज शिवसेनेन मुंबईत धडक मोर्चा काढला होता. दरम्यान, या मोर्चात आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकवीमा कंपन्या आणि बॅंकाना दिला. यावेळी राज्यातील सर्व वीमा कंपन्या आणि बॅंकांना मी हात जोडून विनंती करतो की, आम्हाला आक्रमक व्हायला लावून का. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला आहे तसेच ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, त्यांची नावे या कंपन्यांनी आणि बॅंकांना पंधरा दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला आहे. बीकेसीत शिवसेनेच्या पीकविमा मोर्चाची सांगता झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रावेळी मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बांधील आहोत. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही, त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेने मुंबईत हा धडक मोर्चा काढला आहे. जी व्यक्ती माणूस म्हणून जगतेय त्यांचा हा मुद्दा आहे, याला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशा शब्दांत त्यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली.