डोंगर फोडून खिंडीतून रस्ता काढताना दक्षतेचा अभाव
बेल्हे- मुबंई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आणे घाटात वळणे कमी करण्यासाठी डोंगर फोडून खिंडीतून मार्ग निर्माण केला; पण संबंधित ठेकेदार कंपनीसह अधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने खिंडीच्या एका कड्याची दरड रविवारी (दि. 9) सायंकाळी पहिल्याच पावसात कोसळली. दरम्यान आणे घाटात रविवारी झालेल्या पहिल्या पावसात कोसळलेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नाही.
मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर प्रमुख भाग असलेल्या आणे घाटात रस्त्यावर वळणे कमी करताना ठेकेदार कंपनी आणि अधिकाऱ्यांनी डोंगर फोडून खिंडीतून रस्ता तयार केला; पण हा रस्ता बनविताना खिंडीतील रस्त्यावर दोन्ही बाजूंच्या कडाच्या दरडी कोसळून दुर्घटना, अपघात अथवा वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे होते; पण तसे झालेले दिसत नाही.
पावसामुळे या घाटात दरड कोसळण्याची भीती असल्याचे अनेक वेळा प्रसार माध्यमांतून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निदर्शनास आणूनही त्यावर उपाययोजना राबविण्यात आली नाही. रविवारी (दि. 9) झालेल्या पहिल्याच पावसात एका कड्याची दरड कोसळली. त्यावेळी सुदैवाने वाहतूक तुरळक होती त्यामुळे दुर्घटना टळली.
दरम्यान सोमवारी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून संबंधित ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापनाने रस्त्यावरील राडारोडा तात्काळ उचलला; पण आणे घाटातील रस्त्यावर दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाय योजना राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.