आशिक के तई आपने सज अपनी दिखाने को।
मलमल का अंगरखा वो सौ बार पहन निकले।।
कोण्या एका शेरमध्ये कवी म्हणतो, बाहेर निघालेला प्रियकर तिनं आपल्याला रस्त्यात पाहिलंच तर आपण तिला छान दिसावं म्हणून उगाचच शंभरदा मलमलचा अंगरखा घालून फिरतोय… हे आज जरी थोडं गमतीदार वर्णन वाटत असलं तरी मागच्या शतकापर्यंत अंगरखा हा खरोखरच फॅशनमध्ये होता!
अंगरख्याचा इतिहास पहायचा म्हटला तर तो अगदी प्राचीन संस्कृत साहित्यात आढळतो. शिवाय दुसऱ्या चंद्रगुप्तानं सुवर्ण मुद्रांवर अंगरखा घातलेल्या लढवय्या सैनिकाची मुद्रा कोरलेली आहे. “अंगरखा’ हा शब्दच मुळी “अंगरक्षक’ या संस्कृत शब्दावरून आला आहे. जो मुख्य अंगाचं म्हणजेच शरीराचं रक्षण करतो तो अंगरखा. मध्ययुगामध्ये संत तुकाराम, शिवाजी महाराज आणि त्या नंतर पेशव्यांचा पोशाख डोळ्यासमोर आणला तर हा अंगरखा नेमका कसा होता ते लक्षात येईल. अंगरख्याचं वैशिष्ट्य म्हणजे डोक्यावरची पगडी वेगवेगळी असूनही भारतात अंगरखा मात्र सर्वत्र सारखाच असलेला आपल्याला दिसतो. गंमत म्हणजे अंगरखा हा पोशाख त्यात फारसा बदल न होता संपूर्ण भारतासह पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्येही घातला जातो. त्यात बदल म्हणजे त्याची उंची, त्यात वापरलेलं कापड, त्याचा घोळ आणि त्याला गुंड्या कुठून असणार इतकाच होता.
अंगरख्याची साधारण धाटणी म्हणजे बंद गळा, मनगटापर्यंत बाह्या, खांद्याची रुंदी, कमरेपर्यंत घट्ट, कमरेखाली कमी-जास्त घोळ आणि घोट्यापर्यंत लांबी अशी असायची. अंगरख्याला दोन पाख्या म्हणजेच कपड्याच्या एकावर एक येणाऱ्या दोन बाजू असतात. त्या एकमेकींवर आल्या की छातीवर त्याचा अर्धचंद्र आकार तयार व्हायचा त्या एका बाजूला दोऱ्यांनी बांधलेल्या असायच्या, यांना बंद म्हणायचे.
महाराष्ट्रात हे अंगरखे बऱ्यापैकी चुणीदार किंवा घोळदार असायचे. जास्त कपडा घ्यायची ज्याची ऐपत असेल तो जास्त घोळाचा अंगरखा शिवायचा. भारतात सगळीकडेच सारख्या प्रकारचे अंगरखे वापरले जायचे. त्याच्या आत गंजी, आंगी किंवा बंडी असे. घरात फक्त हिच वस्त्रे वापरली जायची. बाहेर जाताना त्यावर अंगरखा चढवला जायचा. अंगरखा अनेक रंगांचा असायचा. त्यात गुलाबी, केशरी, पिवळा, हिरवा, निळा असे अनेक रंग असायचे. सणावाराच्या प्रसंगी कशिदा आणि जरीकाम केलेले किंवा बुंदीची नक्षी असलेले अंगरखे होते. अंगरख्याचं कापड सुती, रेशमी, किनखापी किंवा मलमलचं असायचं. थंडीच्या दिवसात वापरायचे अंगरखे पश्मिना किंवा धनगरी लोकरीचे होते.
मराठी प्रांतात अंगरख्याशिवाय बंदी, बारबंदी आणि मांडचोळणा असे कपडेही वापरात होते. या बंदीवरूनच “बंडी’ हा प्रकार निर्माण झाला असावा. बाराबंदी या प्रकारावरूनच त्या वेळी आजच्यासारखी बटण किंवा गुंडी नव्हती हे सिद्ध होतं. बारबंदी म्हणजे अक्षरश: जिला छातीवर बारा बंद असतात असा अंगरखा.
गुजरात, राजस्थान अशा राज्यांतही अंगरखा वापरला जातो. या राज्यांमध्ये हा अंगरखा कमरेपर्यंत आपल्या अंगरख्यासारखाच असतो; पण त्याला उंची कमी असते. जवळपास मांड्या आणि पार्श्वभाग झाकला जाईल इतकीच याची उंची असते आणि याला मोठा घेर देणाऱ्या चुण्या मात्र भरपूर असतात. हे अंगरखे आताची तरुण पिढी दांडिया खेळताना मोठ्या प्रमाणात वापरते. याला कोणत्यातरी एकाच बाजूला बंद असतात. पण यावर गुजरात आणि राजस्थान या भागांची ओळख असलेली बांधणीची नक्षी मात्र जरूर असते. याच प्रकारच्या बिहारी वस्त्राला “मिरजाई’ म्हणतात. याच प्रकारचे अंगरखे पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा या ही राज्यांत वापरले जातात. फक्त ते गुडघ्याच्याही खाली पोचतील इतके लांब असतात. प्रत्येक राज्याची पद्धत आणि कापडाचा प्रकार थोड्या फार प्रमाणात वेगवेगळा असतो. पण पुरुषांचा पोशाख भारतात सर्वदूर सारखाच होता यावर मात्र या अंगरख्यानं शिक्कामोर्तब केलं हे नक्की.
अमृता देशपांडे