आपल्या भागातील समस्या, प्रश्न आम्हाला पाठवा…, आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी देऊ. “प्रभात’च्या माध्यमातून सुरू झालेला जनसंवाद प्रशासन जागे होईपर्यंत सुरूच राहील…
तुळशीबागवाले कॉलनी
महापालिकेकडून बराच गाजावाजा करून मागील काही दिवसांपूर्वी स्वच्छता अभियान राबविण्यात आले भिंतीना रंगरंगोटी करण्यात आली. नागरिकांच्या कराच्या पैशाचा मोठ्याप्रमाणात चुराडा करण्यात आला.परंतु, परस्थिती जशी होती तशीच राहिली, जागोजागी कचऱ्याची नवीन ठिकाणे तयार झाली आहेत. स्थानिक प्रशासनाला शाहु वसाहत व तुळशीबागवाले कॉंलनी या भागात रात्रीच्या वेळी घंटागाडी सुरू करण्यात यावी, अशी मागणी चार महिन्यांपासून रहिवासी करत आहेत. परंतु, प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे.
फारूख शेख
गोखलेनगर
गोखलेनगर येथील वीर सावरकर मित्र मंडळाच्या चौकात काही दिवसांपासून मांजर मरून पडले आहे. त्या मांजरावर सध्या माशा बसत आहेत.त्याचबरोबर दुर्गंधी पसरली आहे. याठिकाणी अनेक जुनी वाहने सुद्धा पडून आहेत. त्यामुळे याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. येथे स्वच्छता विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
डॉ. सुहास शितोळे
हिराबाग चौक
काही दिवसांपासून हिराबाग चौकात गॅसलाईन टाकण्यासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. अभिनव चौकातून येणारी भरधाव वाहने या खड्ड्यात आदळून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिकांनी याठिकाणी खबरदारी म्हणून बॅरिकेट लावले आहेत, मात्र, पालिकेने हा रस्ता त्वरीत दुरुस्त करून खड्डा बुजवावा.
निलेश चव्हाण
पुणे
दिव्यांग व्यक्तींना सुद्धा स्वच्छतागृहांचा उपयोग करता यावा यासाठी रॅम्प बांधण्यात आले आहेत. तसेच, कित्येक ठिकाणी त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे देखील बांधण्यात आली आहेत. परंतु, ही स्वच्छतागृहे बंद ठेवण्यात आल्यामुळे अडचण होत आहे. स्वारगेट जवळील स्वच्छतागृह बंद आहेत. याशिवाय ढोले पाटील रोड, मंडई येथील स्वच्छतागृहे सुद्धा बंद आहेत तरी दिव्यांगासाठी बांधण्यात आलेली स्वच्छतागृहे सुरु करावीत, अशी मागणी होत आहे.
अनिल अगावणे
बालाजीनगर
पुणे-सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे याठिकाणी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी नसतो. या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. पण, त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. वाहने सुसाट वेगाने पुढे जातात. दिवसभर पोलीस नसला तरी चालेल पण, सायंकाळी तरी वाहतूक पोलीस नेमावा, अशी मागणी होत आहे.
निलेश खमितकर