नगर – जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत महिलाराज येणार आहे. सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाल्याने यापदासाठी विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे यांच्यासह सुनिता भांगरे, सुनिता खेडकर यांच्या अनेक दावेदार ठरले आहेत.
दरम्यान, राज्यात बदलत्या राजकीय समिकरणामुळे जिल्ह्यात राजकीय गणिते बदलली जावू शकतात. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत जिल्ह्यात उलथापालट होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत काढण्यात आली. त्यावेळी नगरचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले. विधानसभा निवडणुकीमुळे विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांसह अन्य सभापतींना चार महिने मुदतवाढ देण्यात आली होती. येत्या 20 जानेवारीपर्यंत ही मुदत पदाधिकाऱ्यांना मिळाली आहे. त्यापूर्वी आज अध्यक्षपदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेपूर्वी जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याबरोबर भाजपमधून देखील काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेच्या संख्याबळात बदल झाले आहे. अर्थात तांत्रिक दुष्ट्या हे सदस्य मुळ पक्षात आजही आहेत. मनाने मात्र ते नव्या पक्षात आले. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी 19, भाजप 14, शिवसेना 7, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, महाआघाडी 2, भाकप 1, जनशक्ती 1, अपक्ष 1 असे संख्याबळ होते.
लोकसभा निवडणुकीनंतर माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अकोलेतून माजीमंत्री मधुकर पिचड, पारनेरमध्ये सुजित झावरे, श्रीगोंद्यातून नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अकोलेतून आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भाजपतून राष्ट्रवादीत तर शिवसेनेतून आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा परिषदेत विखे, पिचड, नागवडे गटाचे सदस्य तांत्रिक दुष्ट्या मुळ पक्षात असले तरी ते नेत्यांबरोबर नव्या मनाने आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत हे सदस्य काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलीच मुसंटी मारली. 12 जागापैकी सहा जागा मिळविल्या तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. त्यात राज्यात देखील सत्ता स्थापनेचे समिकरण बदलले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना- कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस असे महाशिवआघाडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. महाशिवआघाडी झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपदाची संधी मिळून शकते.
राष्ट्रवादीचे 19, कॉंग्रेसचे 23 व शिवसेना 7 तसेच शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे 5 असे समिकरण जुळू शकते. अर्थात कॉंग्रेसचे 23 सदस्य असले तरी विखे गटाला मानणारे 14 जण आहेत. त्यामुळे मुळ कॉंग्रेसचे 9 सदस्य राहिली. तरी महाशिवआघाडीचे सत्ता येवू शकते. महाशिवआघाडीत राष्ट्रवादीचे समिकरणे जुळले तर विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांचे नाव आघाडीवर राहू शकते. परंतु अकोले तरी एकास एक लढत करतांना राष्ट्रवादीने अशोक भांगरे यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला आहे. त्यामुळे सुनिता भांगरे यांचे नाव देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पक्षांतराच्या गणिताचा विचार केला तर भाजपचे संख्याबळ जास्त होते. अशावेळी विखे पुन्हा अध्यक्षपदाचा दावा करू शकतात. त्यावेळी कर्जत-जामखेडमधून सुनिता खेडकर यांचे नावे पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच विखेंनी नागवडे यांच्या भाजप प्रवेश करू घेतांना त्यांना अध्यक्षपदाचा शब्द दिला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अनुराधा नागवडे यांचे नाव भाजपकडून ठरू शकते. सध्या तरी जर तरच्या गोष्टी आहे.
विखेंना भाजपमधून विरोध होणार
विखेंनी जिल्हा परिषद अध्यक्षपद पुन्हा पदरात पाडण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपप्रवेशाचा सपाटा लावून पक्षाचे संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभा निवडणुकीत ज्या नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. ते तर पराभूत झाले. पण जे विद्यमान आमदार होते. ते ही पराभूत झाले.
या पराभवाला विखेंच कारणीभूत असल्याचे पराभूत उमेदवारांसह मताधिक्क्य कमी झालेल्या भाजपच्या आमदारांनी लेखी स्वरूपात पक्षाकडे दिले आहे. त्यामुळे विखे गट सध्या तरी एकाकी पडला आहे. या पार्श्वभूमिवर भाजपमधून विखेंना अध्यक्षपदासाठी विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.