रमेश जाधव
रांजणी – जिल्हा परिषद, तसेच पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने निवडणूक लढवू पाहणाऱ्या मातब्बरांचा आणि नव्याने तयार असलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक नक्की कधी होणार, याची चर्चा सध्या गावोगावी होत आहे.
पुणे जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. मात्र, आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मातब्बरांबरोबर नवीन इच्छुक देखील राजकारणात उतरू पाहणारे उमेदवार निर्माण झाले आहे. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्याच तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. गेल्या एक वर्षभरापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अद्यापही निवडणुकीची तारीख निश्चित झाली नाही.
दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीची निवडणूक लढवून सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून पाऊल ठेवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. निवडणूक लागण्याआधी पासूनच इच्छुक उमेदवार पुन्हा राजकीय नशीब आजमाविण्यासाठी तयारीत आहेत तर नवीन इच्छुकांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती. त्यासाठी संबंधितांनी वॉर्डा-वॉर्डात, गावागावांत खर्च करण्यात सुरुवात केली होती. निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांनी जीवाचे रान करून मतदारांच्या गळ्यातील ताईत बनण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांसमोर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते तर अनेक जण मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवणीच्या तयारीत होते.काही मंडळींनी तर विविध उपक्रम राबवण्यासही सुरुवात केली होती. आपण वरिष्ठांच्या मर्जीतील आहोत त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळणार असेच सर्वच पक्षातील इच्छुकांना वाटत असल्याने गुलाल आपल्याच अंगावर पडणार असा भाव आणत होते.
सोशल मीडियाचा वापर करत कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करणे, तसेच प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर काही उच्चशिक्षित इच्छुकांनी भर देत संपर्क वाढविण्यास सुरुवात केली होती; परंतु जसजशी निवडणूक लांबणीवर पडल्याचे लक्षात येऊ लागल्यावर अनेकांनी सुरू केलेल्या तयारीवर आणि नियोजनावर पाणी पडले, तर काहींनी निवडणुकीचा अंदाज घेऊन खर्चावरील हात आखडता घेतला असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येते.
आरक्षण बदलणार की तेच राहणार?
याबरोबरच पहिले जे आरक्षण निघाले होते त्यावर बदल होणार तर नाही ना, या धास्तीने काहींनी मैदान सोडल्यात जमा आहे. आता फक्त वाट पाहायची की निवडणुका कधी लागतात आणि आरक्षण बदलते की तेच राहते. सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याने आपले काय, असा प्रश्न इच्छुकांसमोर आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांनी आपल्या उमेदवारीची तलवार म्यान केली आहे.