पुणे -पाण्याच्या बचतीसाठी महापालिकेने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे केल्यास आधीच दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या उपनगरांना जास्तच त्रास सहन करावा लागेल. ही अडचण लक्षात घेऊन पालिकेत समाविष्ट गावांचा पाणीपुरवठा बंद न करता पूर्ववत ठेवावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
खासदार सुळे यांनी याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले असून, तसे ट्विटही केले आहे. नव्याने समाविष्ट धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसनगरआदी गावांमध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशातच महापालिकेने एक पत्रक जारी करुन दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवणार असल्याचे नमूद केले आहे. ही बाब नागरिकांना अस्वस्थ करणारी आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.