लोणंद -ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी असलेल्या खंडाळा तालुक्यामध्ये 1902 साली स्थापन झालेल्या प्राथमिक शाळा म्हणून लोणंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 1 व नं. 2 यांची ओळख आहे. तब्बल 118 वर्षे झालेल्या या शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने इमारती मोडकळीस आल्या आहेत.
जुन्या दगडी बांधकामाची पडझड सुरू झाल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील साथ प्रतिष्ठानने इमारतींच्या नूतनीकरणासाठी पाठपुरावा केला. त्याला आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांची जोड मिळून नूतनीकरणाचे काम मंजूर करण्यात आले आहे. दैनिक “प्रभात’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते.
साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला व पदाधिकाऱ्यांनी लोणंद बंद व अन्य आंदोलनांचा इशारा दिला होता. शाळेचे उचकटलेले पत्रे. तुटलेल्या फरशा. दरवाजे, खिडक्या, उखडलेले बांधकाम या बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर या शाळा पाडण्यासाठी गेल्या वर्षी 16 डिसेंबरला आदेश काढण्यात आला. लोणंदला नगरपंचायत झाल्याने जिल्हा परिषदेने या शाळा नगरपंचायतीकडे वर्ग करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर निधी मंजूर करण्यासाठी साथ प्रतिष्ठान, शालेय व्यवस्थापन समिती यांनी पाठपुरावा केला.
ज्येष्ठ नेते भिकूदादा कुरणे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील, नगरसेवक हणमंतराव शेळके-पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, साथ प्रतिष्ठानचे कय्युम मुल्ला, मंगेश माने यांनी आ. मकरंद पाटील यांना भेटून विनंती केली. आ. पाटील व जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये चर्चा करून या विषयाला चालना दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी 16 सप्टेंबरला शाळा नं. 1 च्या सात खोल्यांसाठी 49 लाख 49 हजार रुपये व शाळा नं. 2 च्या आठ खोल्यांसाठी 56 लाख 56 हजार रुपये निधीस मंजुरी दिली आहे.
या कामी आ. पाटील यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंद पाटील, पंचायत समिती सभापती मकरंद मोटे, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, केंद्रप्रमुख दशरथ धायगुडे, मुख्याध्यापक भगवान धायगुडे, रोहिदास कापसे, शुभदा भोईटे, सत्त्वशील शेळके, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख संतोष मुसळे, साथ प्रतिष्ठानचे सल्लागार ऍड. विलायत मणेर साहेब, उपाध्यक्ष दीपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण, कार्याध्यक्ष रोहित शेलार, स्वप्निल बुरुंगले, दीपक जाधव, भावेश दोशी, सुनील रासकर, संतोष राऊत व पत्रकारांचे परिश्रम घेतले.