बंगळुरू/अहमदाबाद – तुमच्या मौनामुळे द्वेषाच्या आवाजाला प्रोत्साहन मिळत असल्याचा आक्षेप नोंदवत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात द्वेषमुलक वक्तव्ये आणि अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांविरोधात आवाज उठवला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई मेल केलेल्या या पत्रावर 183 जणांच्या स्वाक्षरी आहेत.
त्यात आयआयएम बंगळुरूच्या 13 तर आयआयएम अहमदाबादच्या तीन प्राध्यापकांचा समावेश आहे.आपल्या देशाच्या बहुसांस्कृतिक चौकटीच्या मुल्यावर विश्वास ठेवणाऱ्या आम्हा लोकांची देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत सन्माननीय पंतप्रधानांच्या मौनामुळे निराशा होत आहे. द्वेषाने भरलेला आवाज आणि धमक्या यांना त्याबाबत आदरणीय पंतप्रधान आपले मौन प्रोत्साहन देत आहे, असे स्पष्ट करून आमच्यात फूट पाडणाऱ्या शक्तीपासून वाचवण्याचे आवाहन त्यात केले आहे.
आयआयएम बंगळुरूच्या पाच प्राध्यापकांनी या पत्राचा मसुदा तयार केला आहे. प्रकाश राज, दीपक मलघन, राजलक्ष्मी मुर्ती, दल्हीआ मणी आणि हेमा स्वामीनाथन अशी त्यांची नावे आहेत. मलघन हे प्रख्यात पर्यावरण अर्थतज्ज्ञ आहेत.यावर गप्प बसणे हा उपाय नाही याची जाणीव झाल्याने विद्यार्थी आणि प्राध्यांपकांचा गट एकत्र झाला. देशाच्या मुख्य प्रवाहाने द्वेषाला बाजूला केले आहे. त्यामुळेच आम्ही येथवर पोहोचलो आहोत, असे राज यांनी सांगितले.
पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या आयआयएम बंगळुरूमधील अन्य प्राध्यापकांमध्ये इश्वर मुर्ती, कांचन मुखर्जी, अरप्रीत एस, राहूल डे, साई यायावरम, राजलक्ष्मी कामथ, रुत्विक बॅनर्जी, मनस्वीनी भल्ला यांचा समावेश आहे. तर या संस्थेतील अहमदाबादचे प्रा. अंकुर सरीन, नवदीप माथूर आणि राकेश बसंत यांचाही समावेश आहे. प्राध्यापक बसंत म्हणाले, या पत्रात स्वाक्षरी करणाऱ्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. तीच भूमिका आमची आहे. त्याव्यतिरिक्त बोलण्यासारखे काही त्यात नाही.
राज म्हणाले, जर विद्वेषाचा आवाज मोठा होत असेल तर मिमांसेचा आवाजही मोठा व्हायला हवा, हाच या मागचा प्रमुख उद्देश आहे.राज यांच्या मते, दक्षिण बंगळुरूचे खासदार तेजस्वी सुर्या यांचे मुस्लीम आणि ख्रिश्चनांच्या धर्मांताराची भाषा, अलीकडे चर्चवर देशभरात होत असलेले हल्ले, आणि धर्म संसदेत झालेली भाषणे या प्रश्नांची व्यापकता स्पष्ट होत आहे, असे या पत्रलेखकांचे मत झाले आहे, त्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
कोणतेही भय अथवा लाज न बाळगता आपल्या धर्माचे आचरण करण्याची परवानगी आपल्या राजघटनेने दिली आहे. पण सध्या देशात भयाचे वातावरण आहे. चर्चसह धार्मिक स्थळांची अलीकडे नासधूस केली जात आहे. आपल्या मुस्लीम बंधु भगिनींविरोधात शस्त्रे उचलण्याचे आवाहन केले जाते हे सारे कोणत्याही कारवाईचे अथवा शिक्षेचे भय न बाळगता केले जाते, असे सांगून नागरिकांमध्ये फूट पाडणाऱ्या शक्तींविरोधात पंतप्रधानांनी ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.