नवी दिल्ली: कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ कार्यालयात थांबून काम करावं असे बहुतेक कंपन्यांना वाटत असत. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम संस्कृती सुरु झाली. त्याच्यानंतर आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कंपन्यांमध्ये कामाला येण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेग आणि सोबत वेळही वाढल्याचे दिसत आहे. मात्र सध्या एका कंपनीच्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
तुमच्या कामाचे तास संपले. त्यानंतर लगेचच तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर ‘शिफ्ट संपली, आता कृपया घरी जा,’ असा मेसेज येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तन्वी खंडेलवाल नावाच्या एका कर्मचाऱ्याने लिंक्डइन पोस्टच्या माध्यमातून तिचा अनुभव शेअर केला आहे. तन्वी यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तन्वी एचआर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या कंपनीची कार्यपद्धती पोस्टमधून मांडली आहे. ही काही प्रमोशनल किंवा काल्पनिक पोस्ट नाही, तर हे माझ्या ऑफिसमधलं वास्तव आहे, असे तन्वी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तन्वी यांनी त्यांच्या पोस्टसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये एक महिला कर्मचारी डेस्कटॉपवर काम करताना दिसत आहे. ‘वॉर्निंग! तुमची शिफ्ट संपलीय. ऑफिस सिस्टिम पुढच्या १० मिनिटांत बंद होईल. कृपया घरी जा,’ असा मेसेज कर्मचाऱ्याच्या डेस्कटॉपवर दिसत आहे. ‘ऑफिसचं काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन गरजेचं आहे. त्यामुळे कंपनी ठरलेल्या तासांपुढे कर्मचाऱ्यांना काम करू देत नाही,’ असे तन्वी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
तन्वी खंडेलवाल सॉफ्टग्रिड कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतात. ही कंपनी मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये आहे. अतुल्य आयटी पार्कमध्ये कंपनीचे कार्यालय आहे. ‘माझी कंपनी काम आणि आयुष्य यांच्यातील संतुलन महत्त्वाचं मानते. त्यामुळे असा स्पेशल रिमांडर मिळतो. कामाचे तास संपल्यानंतर डेस्कटॉप लॉक होतो. कामाचे तास संपल्यानंतर नो कॉल्स, नो मेल्स. हे भन्नाट आहे. नाही का? तुम्ही अशा प्रकारे काम करत असल्यामुळे मनडे मोटिव्हेशन किंवा फन फ्रायडेची गरज भासत नाही,’ असे तन्वी यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे