मुंबई – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट पडले आहेत. या राजकीय घडामोडीमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. यानंतर आता शरद पवार यांना साथ देणारे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना भावनिक आवाहन केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आज शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “आम्ही त्या दोन-चार जणांमुळे बाहेर पडलो असं अजित पवार गट सांगत आहे. त्यांनी जर आमच्यामुळे पक्ष सोडला असेल तर मी शपथ देतो, मी विश्वास देतो की, ते जर परत येणार असतील तर मी राजकारण सोडून जातो. सोबत मी जयंत पाटलांना देखील घेऊन जातो.”
पुढे आव्हाड म्हणाले, “अजित पवार गट जयंत पाटील आणि आमच्यावर टीका करत आहे की बडव्यांनी शरद पवार साहेबांना घेरले आहे. या बडव्यांना नाही राहायचं. आम्हाला काहीही नको. आम्ही सगळं सोडून जातो. तुम्ही फक्त परत या, पण साहेबांना त्रास देऊ नका.” आव्हाड यांच्या भावनिक आवाहानानंतर अजित पवार गटातील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार ते पाहावे लागणार आहे.
तर दुसरीकडे, या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शनिवार, 8 जुलै रोजी नाशिकच्या येवला येथे जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोब गेलेल्या छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच पवारांची ही पहिली सभा होणार आहे.
भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी ही सभा होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी शरद पवार यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये भुजबळ यांच्याकडूनही शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. मात्र आता शरद पवार बंडखोर नेत्यांबाबत काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.