अरुण गोखले
मानवी जीवन हा एक संग्राम आहे. इथं प्रत्येकालाच क्षणोक्षणी पुढे येणाऱ्या विविध प्रसंगांशी झुंजावे लागते. “रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ ह्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे आपल्या प्रत्येकालाच इथे सतत झुंजावे लागते. ही झुंज आहे सत्य असत्याची, खऱ्या खोट्याची, नीती अनितीची, भल्या बुऱ्याची, चांगल्या वाईटाची, विवेक आणि अविवेकाची. इथं नेहमीच ह्या दोन्ही गोष्टीत सतत संघर्ष चालू असतो. हा संघर्ष घरादारात, शेजारपाजाऱ्यांत, इतकंच नव्हे तर अगदी माणसाच्या मनातही सतत चालू असतो. एकूणच काय! तर आपण सारेजण हे या जीवन संग्रामातले अर्जुन आहोत. या संदर्भात मला माझ्याच एका कवितेच्या ओळी आठवतात.
आयुष्याच्या समरांगणीं या । मी ही आहे अर्जुन एक।
झुंजू कैसा या समरासी। माझ्या पुढती प्रश्न अनेक।।
खरोखरच तुमची माझी आपल्या सर्वांचीच अवस्था थोड्या फार फरकाने अशीच आहे. हे युद्ध नेहमी दोन्हीकडे चालूच असते, आत आणि बाहेरही. थोर तत्त्वज्ञ श्री कृष्णमूर्ती म्हणतात- मानवी जीवनातले बाहेरचे युद्ध हे बाह्य परिस्थितीशी चालू असते तर आतले युद्ध हे माणसाचे माणसाशीच म्हणजे त्याच्यातीलच चांगल्या आणि वाईटाशी चालू असते. बाह्ययुद्ध हे माणसाला कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीशी खेळावे लागते. त्यामध्ये स्वत:चे अस्तित्व टिकवणे, बचाव करणे, जगणे या सारख्या गोष्टींचा समावेश असतो.
तर माणसाचे आंतरिक भावनिक युद्ध हे नेहमी सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य यांची निवड करताना, भावनिक हितसंबंध प्रस्थापित करून ते टिकवताना, त्यात दुराव्याची दरी पडणार नाही याची खबरदारी घेताना करावे लागते. त्यात प्रसंगी स्वत:च्या इच्छा आकांक्षांना सुद्धा मारावे लागते. आपल्याच मनातील दुष्ट विचार, भावना, वृत्ती ह्यांना संयम, विवेक आणि वैराग्याच्या शस्त्रांनी धाकात ठेवावे लागते.
या आतल्या आणि बाहेरच्या संग्रामात अनेकदा सामान्य माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होते, विवेक हरवून जातो, नेमके काय करावे किंवा काय करू नये हे त्याला ठरवता येत नाही. हे युद्ध कसे, कशाने आणि कोणाविरुद्ध आणि ते का करू असे प्रश्नही त्याच्या पुढे उभे राहतात. त्यावेळी त्याला त्या अर्जुनाला भेटलेल्या श्रीकृष्णा सारख्या खरा मार्गदर्शक हवा असतो.