सागर ननावरे
ऍमेझॉनच्या जंगलाला अनेक दिवसांपासून लागलेली आग ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे. हा वणवा मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित हा वाद सध्या सुरू आहे. मात्र, या वणव्याचे परिणाम संपूर्ण मानव जातीला भोगावे लागणार हे नक्की…
श्रावणी वणवा
पेटला वनात
फुफ्फुस पेटता
भीती दाटते मनात…
पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऍमेझॉनच्या जंगलात गेले काही दिवस भयानक वणवा पेटला आहे. या वणव्याची तीव्रता इतकी भयंकर आहे की ज्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण मानवी शरीरात फुफ्फुसाचे काय महत्त्व आहे हे आपणास माहीतच आहे. परंतु वसुंधरेच्या फुफ्फुसाबद्दल चिंतेचे वातावरण झाल्याने भविष्यातील मोठ्या संकटाचीच जणू चाहूल लागली आहे.
ज्या ज्या वेळी मानवाने निसर्गाला ओरबाडून निसर्गचक्रात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे, त्या त्या वेळी निसर्गाच्या रुद्रावताराचा सामना मानवाला करावा लागला आहे. आज माणूस अंतराळात गेला आहे. ज्ञान व विज्ञानाच्या जोरावर मानवाने अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. मात्र एवढे असूनही निसर्गाशी दोनहात करण्याइतके सामर्थ्य अजूनही माणसाला अवगत नाही. त्यामुळे प्रचंड नुकसान आणि पश्चाताप करण्याशिवाय मानव काहीही करू शकत नाही.
आजच्या आधुनिकरणाच्या युगात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे प्रदूषणाच्या ज्वाला आकाशापर्यंत पोहचल्या. प्रदूषणामुळे निसर्गाचे चक्र जणूकाही उलटे फिरू लागले आहे. जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे आणि यामुळे निसर्गाच्या भयंकर रूपाचे दर्शन घडत आहे.
जगातील सर्वांत मोठे वर्षावन म्हणून ऍमेझॉनचे जंगल ओळखले जाते. अमेझॉनच्या जंगलांचे क्षेत्र 5 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके आहे.
जगाच्या एकूण पर्जन्यवन क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक हिस्सा केवळ ऍमेझॉनच्या जंगलांमध्ये आहे. एकूण 9 राष्ट्रांत पसरलेल्या या जंगलाचा 60 टक्केहून अधिक भाग हा ब्राझीलमध्ये मोडतो. त्यामुळे जगाचे लक्ष आता ब्राझीलकडे लागून राहिले आहे. या जंगलात गेल्या काही दिवसांत 73 हजारहून अधिक आगी लागल्याचे सांगण्यात आले. ज्यात लाखो झाडे जळून खाक झाली आणि लाखो वन्यजीव होरपळून मृत्युमुखी पडले. ब्राझील राष्ट्राच्या उत्तरेकडील रोरैमा, एक्रे, रोंडोनिया आणि ऍमेझोनास या राज्यांमध्ये वणव्याची मोठी झळ बसलेली दिसून आली. या जंगलाला ऑक्सिजनचे माहेरघर म्हणून ओळखले जाते कारण पृथ्वीच्या एकूण ऑक्सिजनपैकी 10 ते 20 टक्के ऑक्सिजनचा साठा या एका ठिकाणी आढळतो.
अथमेझॉनमध्ये जुलै ते ऑक्टोंबर या काळात उन्हाळा असल्याने वणवे पेटतात. मात्र यंदा ऑगस्ट महिन्यात सलग अनेक दिवस पेटत राहिलेला वणवा भयंकरच मानावा लागेल.
धुराच्या गडद छायेने इथे दिवसाढवळ्या अंधार दिसत होता आणि त्यामुळेच ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी 20 ऑगस्टपासून ब्राझीलमध्ये आणीबाणी घोषित केली. तसेच मोठ्या प्रमाणात लष्करी कुमक देखील मागविण्यात आली आहे. युरोपीय संघाच्या कोपर्निकस एटमॉस्फियर मॉनिटरिंग सर्व्हिस (सीएएमएस)नुसार आगीमुळे 228 मेगाटन कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन झाल्याचे दिसून आले.
युरोपीय महासंघाने व्यापारात कपात करण्याची धमकी दिल्यावर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पथके पाठविली. आग नियंत्रणाचे कार्य अद्यापही चालूच आहे. काही प्रमाणात आगीवर नियंत्रण येताना दिसले आहे. ऍमेझॉनची ही आग मानवनिर्मित असल्याचा अनेक पर्यावरणतज्ज्ञांचा दावा आहे. यात ब्राझीलचे अध्यक्ष यांनाही दोषी मानण्यात आले आहे. परंतु ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सोनारो यांनी हे राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगितले. यातून विनाशक राजकारणाचे खरे रूप जगाला पाहायला मिळत आहे.
वर्चस्वासाठी माणूस कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. मात्र स्वतःच्या विनाशासाठी मानवप्राणी स्वतःच कसा जबाबदार आहे हे या ब्राझीलच्या आगीतून व इतर घटनांतून सातत्याने दिसून येत आहे. ऍमेझॉन हे जगातील सर्वांत मोठे वर्षावन असून, ते मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव काही प्रमाणात का होईना कमी करण्यास ऍमेझॉन या वर्षावनाची नक्कीच मदत होत आहे; परंतु आता या आगीने कार्बन बरोबरच जागतिक तापमानवाढीची भीती अधिकच गडद केली आहे.
आता ही भयावहता लक्षात घेऊन जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात ध्येयधोरणे आखली जातील. परंतु ती वेळीच अमलात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी वेळीच हा धोका ओळखून जागरूक व्हायला हवे. ऍमेझॉन कुठे भारतात येते? ते भारतापासून खूप दूर आहे? आपल्याला माहीत नसणाऱ्या पशुपक्षी, वनस्पतींचे आपल्याला काय करायचे आहे? किंवा आपला याच्याशी काय संबंध? असे अनेक प्रश्न आपल्याला पडणारच. परंतु आपण पृथ्वीवासी आहोत आणि जर पृथ्वीवरील ऑक्सिजनचा स्रोतच नष्ट होत असेल तर, नक्कीच याचे परिणाम मनुष्यजातीसाठी जीवघेणे असणार.