मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत विधान करून हिंदुत्वाचा नारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुकही केलं होतं. तेव्हापासून राज ठाकरे कट्टर हिंदुत्वासह भाजपसोबत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राज यांना गुरुवारी भाजप खासदाराने कडाडून विरोध करत इशारा दिला होता. त्याला मनसेच्या अभिजीत पानसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांवर मनसेच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यांबद्दल व त्यांच्या अपमानाबाबत राज ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.
मनसेचे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, अशा लोकांना महाराष्ट्र सैनिक आणि स्वत: राज ठाकरे भीक घालत नाहीत. राज ठाकरेंबद्दल बोललं की प्रसिद्धी मिळते. त्यांना ती प्रसिद्धी मिळाली आहे. पण हे झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोन गेलेला आहे. त्यांना योगींनी गप्प बसा सांगितलं असं अभिजीत पानसे यांनी सांगितलं आहे.