– दीपक येडवे
वीसगाव खोरे :- खानापूर (ता. भोर) येथील एका शेतकऱ्याने पारंपरिक भात शेतीबरोबरच बागायती शेतीही सौर ऊर्जेचे वापर करून तयार केली आहे. यामध्ये केळी, द्राक्ष आदी पीक घेतले जाते आहे.
भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात रासायनिक खतांचा, औषधांचा कमीत कमी वापर आणि सेंद्रिय व जिवाणू खतांचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पध्दतीने, तसेच सौर ऊर्जेचा वापर करून पाच एकर जिराईत शेती बागायती करून दशरथ सखाराम थोपटे या शेतकऱ्याने किमया केली आहे.
वीसगाव खोरे (ता. भोर) हा बहुतांशी डोंगराळ भाग आहे. येथे पावसाळ्यात प्रंचड पाऊस पडतो; पण उन्हाळ्यात ओढे-नाले ओस पडतात. पिण्याचे, जनावरासाठी लागणाऱ्या पाण्याचा तुटवडा असतो. मात्र, अशा भागात पारंपरिक शेतीला फाटा देत सतत होणारे भारनियमन, कृषीपंपाना रात्रीचा उपलब्ध होणारा वीज पुरवठा, वीज बिलातून सुटका व्हावी या करता या प्रकल्पाचा उपयोग प्रगतशील शेतकरी दशरथ थोपटे यांनी केला आहे.
“या पंपाच्या पाणी क्षमतेनुसार 2 एकर केळी, 16 आर द्राक्ष, 2 एकर भात, 1 एकर कांदा अशी उन्हाळी पिके घेतली आहेत. दिवसभर सुरू असलेल्या सौर पंपामुळे या पिकांना पाणी देणे सुलभ झाले असून, रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी भरण्याचा त्रास देखील वाचला आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्याने वीजबिलांचा किंवा इंधनाचा खर्च नाही. हा सौर पंप सुमारे 25 वर्षे सेवा देतो. पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाच वर्षे सौर कृषीपंप किंवा पॅनलची विनामूल्य दुरुस्तीकिंवा ते नवीन बदलून दिले जो. सौर पॅनलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे क्वचितच नुकसान होते. वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसवण्यात आले आहे.”
– दशरथ थोपटे, प्रगतशील शेतकरी, खानापूर, (ता. भोर)
दिवसभरात तीन एकर क्षेत्र सिंचनाखाली
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून 5 एचपी क्षमतेचा मोटरपंप दशरथ थोपटे यांनी बसविला. 16 सोलर पॅनलमधून 5 केडब्ल्यूपर्यंत वीज निर्मिती होते. मोटार 5 डीसी करन्ट तत्त्वावर चालते. दिवसभरातील सूर्यप्रकाशावर सेलमधून सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होऊन विद्युतपंप सुरू होतो. साधारणतः सकाळी 9 ते सांयकाळी 5 पर्यंत पंप चालतो. या पाण्याच्या पंपामधून ठिबकचा वापर करून दिवसभरात तीन एकर क्षेत्र सिंचनाखाली येते.