चिदंबरम: संकटातून बाहेर काढण्याची योजना विचित्र
नवी दिल्ली : येस बॅंकेचा फज्जा उडण्यास मोदी सरकारचे आर्थिक संस्थांविषयक गैरव्यवस्थापन कारणीभूत आहे, असे टीकास्त्र माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी शनिवारी सोडले. संबंधित प्रकरणात आरबीआयने सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
येस बॅंकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी एसबीआय पुढे सरसावली आहे. मात्र, ती योजना विचित्र आहे. एसबीआय स्वेच्छेने पुढे आली असल्याचे वाटत नाही. येस बॅंकेतील घडामोडींची दखल आरबीआय किंवा सरकारमधील कुणीच घेतली नाही का, असा सवाल चिदंबरम यांनी केला.
येस बॅंक अडचणीत आल्याचा ठपका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील यूपीए सरकारवर ठेवला. त्यावरून चिदंबरम यांनी सीतारामन यांची खिल्ली उडवली.
विद्यमान अर्थमंत्र्यांची भूमिका ऐकल्यावर मला अजूनही यूपीएचीच सत्ता असल्याचे आणि मीच अर्थमंत्री असल्याचे वाटते, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. येस बॅंकेचे नियंत्रण कुणाकडेही जावो; पण खातेदारांचे पैसे सुरक्षित राहण्याची निश्चिती व्हायला हवी, अशी अपेक्षाही चिदंबरम यांनी व्यक्त केली.