मोठे स्वप्न बघा…ते पूर्ण करण्यासाठी धडपड करा वाटेत ठेच लागून खाली पडाल तरीही उठून पुन्हा मार्गक्रमण करा… पुन्हा सर्व ताकदीनिशी उठा, सर्व प्रयत्न पणाला लावा.. यश नक्की तुमचेच होईल. हा मूलमंत्र अनेक यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक देतात आणि स्वतःही त्याचे पालन करतात. असेच एक मोठे स्वप्न उराशी बाळगून मराठमोळ्या केतकी गावडे या आज एक यशस्वी महिला उद्योजिका बनल्या आहेत.
सध्या पुण्यातील वारजे येथे राहणारी केतकी गावडे ही मुळातच एक लीडरशिप क्वॉलिटी असलेली मुलगी. दौंडमध्ये मध्यमवर्गीय परिस्थितीत त्या वाढल्या. त्यांच्या वडिलांचा छोटा व्यवसाय, तर आईची शासकीय नोकरी होती. उद्योगधंद्याचे बाळकडून घरातूनच मिळाले मात्र, वडिलांचा आणि माझा व्यवसाय दोघेही वेगळे क्षेत्र आहेत. इतर मुलींप्रमाणेच दहावीनंतर तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. 12 वीनंतर 2009मध्ये Instrumentation and control (उपकरणे आणि नियंत्रण)मध्ये इंजिनिअरिंग केले. त्यावेळी कॅम्पसमधून निवड झाली; मात्र नोकरी लांब असल्याने जाता आले नाही. मग पुण्यातील एका कंपनीत 5 हजार रुपये महिन्यावर नोकरी मिळाली. मात्र, 5 हजार रुपये कमी वाटत असल्याने पार्टटाईम जॉब सुरू केला. त्यावेळी त्यांच्यातील नेतृत्वगुणाचा प्रत्यय येऊ लागला.
त्यांनी नोकरी केली ती पगारासाठी नव्हे. तर कंपनीतील एकूण एक काम शिकण्यासाठी. मालकाने फक्त प्रॉडक्शन बघावे इतर सर्व व्यवहार मी बघते अशी भूमिका घेऊन त्यांनी जीव तोडून काम केले. त्यामुळे नोकरीत तीन महिन्यांच्या आत दोन प्रमोशन मिळाले व पगारही वाढला. त्यानंतर एका मोठ्या कंपनीत काम मिळाले. पूर्ण साईट आणि क्लायंट यांच्यासाठी महाराष्ट्राबाहेर प्रवास करावा लागयाचा. त्याच दरम्यान लग्न ठरले. सगळे खुप गडबडीत झाले; मात्र दोन वर्षांतच संसार मोडला. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक फार मोठे नुकसान झाले. तर ज्या ठिकाणी पाच वर्षे पूर्णपणे झोकून देऊन काम केले त्याठिकाणी जबरदस्तीने राजीनामा देण्यास सांगितला. त्यानंतर दुसरीकडे नोकरी मिळाली. मात्र, घरगुती कारणामुळे इच्छा नसतानाही ती नोकरी सोडावी लागली.
साधारण त्या 6 वर्षांत संपत्ती, काम सगळे संपले आणि 2 वर्षांच्या माझ्या मुलीसोबत मी आई-वडिलांकडे राहू लागले. सगळे आयुष्य परत ‘शून्या’पासून सुरू केलं. एवढं मात्र नक्की केलं होतं की नोकरी करायची नाही. कारण ज्या कंपनांसाठी मी रात्रंदिवस मेहनत केली त्यांनी माझ्या वाईट वेळेत साथ नाही दिली. तेव्हा ठरवलं चहाची गाडी टाकेल पण नोकरी नाही करणार. जेव्हा मित्र-मैत्रिणींच्या आधाराची गरज होती, तेव्हा सगळ्यांनी साथ सोडली. त्याच वाईट परिस्थितीमध्ये एका कामाची संधी मिळाली आणि भागीदारीमध्ये आम्ही फॅब्रिकेशनमध्ये काम सुरू केले.
झिरो बॅंक बॅलन्सपासून पहिल्या वर्षात 3 करोडचा टर्नओव्हर केला. 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना दररोज हॅन्डल करायचे. दुसऱ्या वर्षांत 10 करोडपेक्षा अधिक टर्नओव्हर झाला. आणि कंपनी प्रगती करू लागली. स्वतःच्या बळावर कार आणि ऑफीस घेतले. मुलीचे शिक्षण सुरू झाले. पण साधारण 2 वर्षांनी त्या कंपनीच्या पार्टनरशीपमधून बाहेर काढले. त्यावेळी 12 लाखांचे कर्ज डोक्यावर घेऊन परत एकटी पडले.
पहिल्यावेळी मी “शून्या’पासून सुरुवात केली होती. पण मात्र आता मला उणे 12 लाख (मायनस 12 लाख) पासून सुरुवात करावी लागली. सगळ्यात जास्त पगाराची नोकरी मुंबईला मिळाली म्हणून दररोज पुणे-मुंबई-पुणे अप-डाऊन करू लागली. 1 ते 2 वर्षे तेही केलं व 12 लाखाचे कर्ज कमी करत 2 लाखावर आणलं सिंगल पॅरेंट (पालक) असल्यामुळे मुलीला वेळ देऊ शकले नाही. मुलीची आई व वडील मीच असल्याने दुप्पट पैसे कमवायचे होते. पण मग मुलीसाठी ते काम सोडून पुण्यात स्वतःचा “आयएसओ’चा व्यवसाय सुरू केला.
पहिली नोकरी लागली तेव्हापासून आयएसओच्या प्रात्यक्षिक (डेमॉन्स्ट्रेशन) मध्ये नेहमीच आवड असल्याकारणाने मी परत त्या क्षेत्रात काम करू शकले. कंनीच्या नोकरीचा 9 वर्षांचा अनुभव गाठीशी व “आयएसओ’चे शिक्षण घेऊन स्वतःची Ethics Engineering and consultancy (नीतिशास्त्र अभियांत्रिकी आणि सल्लामसलत) कंपनीची स्थापना केली. आणि 2011 ला काम सुरू केले. दरम्यान, एका मैत्रिणीने मला संघर्ष (स्ट्रगल) करताना पाहिले होते. तिने बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल (Business Network International) (बीएनआय) चा परीचय करून दिला व बीएनआयमार्फत भारत व भारताबाहेर माझा व्यवसाय सुरू झाला.
महा बिझनेसमन ऍवॉड 2019 मध्ये मला “बेस्ट कन्स्लटंन्सी’ ऍवॉर्ड मिळाला आहे. सध्या पूर्ण भारत व भारताहाबेर 1200 पेक्षा अधिक क्लाइंट (ग्राहक) आहेत. 500 पेक्षा अधिक प्रशिक्षण दिले आहेत. तरीसुद्धा ज्यांनी मला त्रास दिला व ज्यांनी साथ दिली. त्या सगळ्यांचे मी आभार मानते. कारण आज मी जी यशस्वी महिला उद्योजिका (सक्सेसफुल बिझनेस वुमन) आहे ती फक्त त्यांच्यामुळंच आहे. माझ्या आयुष्यातले सगळे खड्डे भरून काढत असताना माझ्या लहान मुलीला माझे आई-वडील, भाऊ व वहिनी यांनी खूप जीव लावून सांभाळले. त्यांची साथ होती आणि मी स्वतःवरचा विश्वास कधी सोडला नाही म्हणून आज माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकले.
माझ्या या यशात माझे कुटुंब, मित्र आणि सगळ्या वाईट परिस्थितीची मी ऋणी आहे. आणि सगळ्यात जास्त स्वतःवरच्या विश्वासाची जो कधीच कमी होऊ दिला नाही. एक यशवी उद्योजिका म्हणून नावारुपाला आली ती केवळ तिच्यातील जिद्दीच्या जोरावर. परिस्थितीने घेतलेल्या सर्व अग्निपरीक्षा तिने पार पाडत केवळ स्वत:चा उद्योगच उभा केला नाही, तर खचलेल्या कुटुंबाची मान स्वकर्तृत्वाने उंच करायला शिकवली. “केतकी’ यांना मिळालेली ही यशाची चव इतक्या सहजासहजी मुळीच मिळालेली नाही. त्यासाठी त्यांनी ज्या अग्निपरीक्षा दिल्या आहेत, त्याला मानाचा मुजराच!
टीका करणारे तिथेच राहिले…
चुका होतात पण स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनपण करता येते. मी मागे वळून कधीच नाही पाहिले. रडायच्याऐवजी लढायचे ठरवले. मी मुलगी आहे म्हणून समाजामध्ये कधी सद्भावाना मागितली नाही. मुलांएवढेच कष्ट केले वा मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न केले. अगदी रोज प्रत्येक पावलाला लोकांनी त्रास दिला पण मी धीर नाही सोडला. ते सगळे लोक ज्यांनी मला बाहेर फेकले. तेच सगळे आज मला भेटण्यासाठी वेळ घेतात. माझ्या कंपनीची सेवा घेतात. टीका करणारे सगळे लोक तिथंच राहिले. पण मी त्यांच्या खूप पुढे निघून गेले.
फायदा घेतला पण साथ दिली नाही
आयुष्यात खूप अडचणी आल्या, पण रडायचे सोडून मी आलेल्या परिस्थितीला सामोरे जायचे ठरवले. प्रत्येक मिळालेली नोकरी व संधीमध्ये मी माझे 100 टक्क्यांपेक्षा अधिक मन लावून काम केले व फायदा करून दिला. पण वेळ आल्यावर लोकांनी फायदा करून घेतला पण साथ नाही दिली.
लढायला शिका
प्रत्येक मुलीला माझे हेच सांगणे आहे. की वाईट वेळेत रडत न बसता लढायला शिका, मेहनत करा यश मागे येते. मुलगी आहे म्हणून पाठिंबा मागू नका, काम असे करा की पाठिंबा आपोआप मिळेल. माझ्या मते महिला दिन असा वेगळा साजरा करायची गरज नाही. मुलगा व मुलगी सारखेच आहेत आणि हे सगळे दिवस सगळ्यांचे आहेत.
हा दृढ विश्वासच यशाची गुरूकिल्ली
आयुष्यात चढ-उतार हे नेहमीच येणार आहेत. पण लढत, आपली स्वप्न पूर्ण करण्यात सुद्धा खूप समाधान आहे. सिंगल पॅरेंट असून मी हे सगळे करू शकले. जर मी आयुष्य शून्यातून निर्माण करू शकले तर बाकी सगळे पण नक्कीच करू शकतात. स्पर्धा ही मुला-मुलीमध्ये नाही, तर स्वतःची प्रत्येक दिवसासोबत आहे. स्वतः मध्ये सुधारणा करत राहिलो की आपोआप विजय होतो.
संकलन : राजेंद्र सुरसे, आंबेठाण