यवतमाळ :- जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत 3 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या 11 हजार 374 कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 5 कोटी 68 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. शासनाच्या नवीन निकषाप्रमाणे या बाधितांना पुन्हा प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 5 कोटी 50 लाख वितरित केले जाणार आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात शुभेच्छा देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
देशासाठी लढतांना अनेक शुरविरांना आपल्या प्राणांची बाजी द्यावी लागली. अशा सर्व शुरविरांना, शहीदांना पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. खरीप हंगामासाठी आतापर्यंत 1 लाख 75 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 755 कोटी रुपयांच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 92 हजार शेतकऱ्यांना 676 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफीसह पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 67 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे 254 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत 3 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. कमी कालावधीत यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे केले. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या 10 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 40 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. पूर, अतिवृष्टीमुळे दगावलेल्या 94 जनावरांच्या मालकांना 18 लाख रुपयांचे सहाय्य वितरित करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. केवळ एक रुपयात भरून त्यांच्या पिकांना यावर्षापासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 3 लाख 54 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्यांच्या 7 लाख हेक्टरला संरक्षण प्राप्त झाले आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.